मुंबई : समधूर आवाजाने अजरामर करणाऱ्या प्रख्यात पार्श्वगायिक मुबारक बेगम यांचे मुंबईत रात्री उशीरा निधन झाले. मुबारक बेगम या ८० वर्षांच्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी', 'मुझको अपने गले लगा लो', यासारखी मुबारक बेगम यांची काही यादगार गाणी आहेत. मुबारक बेगम यांनी १९४९ ते १९७२ या कालावधीत  गायलेल्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. 


आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये मुबारक बेगम यांचे जीवन अतिशय हालअपेष्टांमध्ये गेले. आर्थिक बाबींशी त्यांचा संघर्ष शेवटपर्यंत सुरू होता. सरकारनेही त्यांना वेळोवेळी मदत केली होती.


राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील सुजानगडमध्ये मुबारक बेगम यांचा जन्म झाला होता. लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, वाणी जयराम यांच्यासोबत मुबारक बेगम यांनी अनेक गाणी गायली, ती प्रचंड लोकप्रियही ठरली. 


बेगम यांनी १९४९मध्ये आईये या चित्रपटात लतादीदींसोबत त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती.  'हमारी याद आयेगी' या चित्रपटातील 'कभी तनहाईयो में' आणि १९६५ मधील 'खूनी खजाना' या चित्रपटातील 'ए दिल बता हम कहाँ आ गये' या गाण्यांनी त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली.कैफी आझमी, एस.डी.बर्मन, मोहम्मद रफी, खय्याम, शंकर-जयकिशन या दिग्गजांसोबतही त्यांनी काम केले होते.