नागपूर : दुचाकीने चिखल उडाले म्हणून तिघा भावांनी एका १७ वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या गोळीबार चौकात ही घटना घडली असून कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना फक्त, चिखल उडाले या अतिशय शुल्लक कारणाकरता हा हल्ला केला. या याप्रकरणातील आरोपींना तहसील पोलिसांनी अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीरावर ठीक-ठिकाणी घाव असलेल्या १७ वर्षाच्या रक्तबंबाळ अक्षय सहारेचा इतकाच दोष की त्याच्या दुचाकीमुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन तरुणांवर चिखल उडाला. पावसामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचलं होतं. अक्षय सहारेच्या दुचाकीमुळे या दोघांवर चिखल उडाला. चिखल उडाल्यावर झालेल्या भांडणात या दोघांनी अक्षय बेदम मारहाण करायला सुरूवात केली. अक्षय या दोघांची माफीही मागितली. पण त्यांनी अक्षयला मारहाण करण्याची धमकी दिली. त्याला गोळीबार चौकात त्याला बोलावले आणि नाही आलास तर त्याच्या घरी जात मारहाण करण्याची धमकी अक्षयला दिली. 


घरी उगाचच वाद नको म्हणून अक्षय समझोता करण्यासाठी गोळीबार चौकात गेला. तेव्हा तिथे आधीपासूनच हजर असलेल्या रोशन, सचिन आणि अंकुश चिंचघरे या तीन सख्ख्या भावांनी त्याच्यावर वस्तरा आणि चाकूने हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर, पोटावर, पाठीवर आणि शरीराच्या इतर भागांवर तब्बल १७ वार केले. हे होत असताना, गजबजलेल्या गोळीबार चौकात अनेकजणांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. रक्तबंबाळ अक्षयने कसाबसा जीव वाचवून पोलीस स्टेशन गाठलं. 


अक्षयला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय. तिन्ही आरोपींना तहसील पोलिसांनी अटक केली असून सर्वांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कुठलीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसताना, एका शुल्लक कारणाकरता जीवघेणा हल्ला केल्याने तरुण वर्ग असहिष्णू झाला आहे का आहे प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.