बदलापूर : देव तारी त्याला कोण मारी या घटनेची प्रचिती नुकतीच बदलापूर मध्ये आली आहे. एका माथेफिरू माणसाने स्वतःच्या मुलीला पुलावरून नदीत फेकून दिलं, पण पाण्यात ही मुलगी 10 तास अडकून राहिली होती. फायर ब्रिगेडने तिचा जीव वाचवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हास नदी सध्या जलपर्णीच्या विळख्यात अडकल्याची टीका नेहमीच होत असते. मात्र ही जलपर्णीच या चिमुकलीसाठी वरदान ठरली. बदलापूरजवळील एरंजाड गावातल्या पुलाखाली एक चिमुकली पाण्यातून बचावासाठी आवाज देत असल्याचं काही गावक-यांना दिसून आलं. 


एकता सैनी या 6 वर्षांच्या मुलीला तिच्या वडिलांनी चप्पल घेण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर नेलं आणि या पुलावर आणून पुलाखाली फेकून दिलं. मात्र नदीवर तरंगणा-या जलपर्णीमुळे ही मुलगी पाण्यात बुडाली नाही. रात्रभर ती त्या जलपर्णीवर बसून राहीली. अखेर मॉर्निंग वॉकला गेलेल्या गावक-यांना तिच्या हाका ऐकू आल्या आणि गावक-यांनी फायर ब्रिगेडच्या मदतीने तिला बाहेर काढलं. 


ही मुलगी ठाण्याच्या वर्तक नगरातील आहे. आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिच्या आईने अपहरणाचा गुन्हाही दाखल केला आहे. बदलापूर पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.