औरंगाबाद : दहा वर्षीय मुलाचं खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. वर्धन विवेक घोडे असं दहा वर्षीय मुलाचं नाव आहे. औरंगाबादच्या टिळकनगर भागातील गुरुकुंज हौसिंग सोसायटीतून रात्री आठच्या सुमारास वर्धनचं अपहरण झालं. अपहरणानंतर वर्धनच्या सुटकेसाठी पाच कोटी रुपयांची मागणी करणारी चिठ्ठी आढळून आली. मात्र, काही समजायच्या आतच रात्री अकराच्या सुमारास परिसरातील नाल्यामध्ये वर्धनचा मृतदेह सापडला. वर्धनचं अपहरण करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिलाश मोहनपूरकर आणि शाम मगरे अशी आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी त्याच परिसरातील रहिवासी आहेत. रात्री आठच्या सुमारास अभिलाश आणि शाम यांनी वर्धनचं अपहरण करून त्याला कारमध्ये खुलताबादच्या दिशेने नेलं. मात्र, वर्धन सुटकेसाठी प्रयत्न करत असताना आरोपींनी त्याला मारहाण करत त्याचा गळा आवळला. आणि त्यातच वर्धनचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आरोपींनी वर्धनचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत टाकून पुन्हा टिळकनगर भागात आले. त्यावेळी वर्धनचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. वेळ पाहता आरोपींनी देखील वर्धनचा शोध घेण्याचं नाटक केलं.


कोणाला संशय येऊ नये म्हणून गाडीतला मृतदेह परिसरात असलेल्या नाल्यात फेकून दिला. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. वर्धन हरवल्याची तक्रार कुटुंबीयांनी जवाहरनगर पोलिसात दिली. त्यावेळी पोलिसांनी संशय आल्यानं अभिलाश आणि शाम याची चौकशी केली. आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. वर्धनचा मृतदेह नाल्यात फेकल्याचही त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे.