विकास भदाणे, जळगाव : घोटाळ्याच्या आरोपांनी मंत्रिपद गमावलेल्या खडसेंनी अखेर मौन सोडलंय. खडसेंनी खळबळजनक खुलासे केले आहेत. नेमकं अस काय घडलंय ज्यानं देश हादरू शकतो... नाव न घेता खडसेंनी आरोप केले असले तरी स्वपक्षीयांवरच त्यांनी वार केल्यामुळं भाजपची डोकेदु:खी वाढलीय. मात्र, यामुळं खडसेंचाही परतीचा मार्ग खडतर झाल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी जर तोंड उघडलं तर देश हादरेल, असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलंय. खडसेंकडे काय आहे ज्यानं देश हालरेल? कुठलं सत्य खडसेंनी लपवून ठेवलंय? कुणाची भीती आहे खडसेंना? कुणाच्या दबावानं खडसेंनी मौन बाळगलंय? असे असंख्य प्रश्न त्यामुळे निर्माण झाले आहेत. 


रोखठोक बोलणाऱ्या खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच तोंड उघडलं आणि पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलंय... राजीनामा दिल्यानंतर खडसे गेले काही दिवस शांत होते. पुण्यातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी खडसेंची पाठराखण करत त्यांना क्लीन चिट दिली होती. मात्र, खडसेंचं मंत्रीपद गेल्यानंतर या क्लीन चीटचा काय उपयोग? त्यामुळंच की काय खडसें ही वेदना व्यक्त केली.


'आवाज दाबला गेला'


'आवाज दाबून पुरावा न देताच राजीनामा घेतला गेला' असं खडसेंचं वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांच्याचं पक्षातल्या कुणीतरी खडसेंच्या मंत्रिपदाच्या खुर्चीला सुरूंग लावलाय की काय? असं म्हणायला वाव आहे. नेमक्या कुणाच्या दबावामुळं खडसेंची विकेट पडली?  कुणाच्या जोरावर खडसेंचा राजीनामा घेतला गेला? असे असंख्य प्रश्न आता खडसेंच्या वक्तव्यामुळं निर्माण झाले आहेत.


'होय, मीच युती तोडली'


युती तोडल्याचं श्रेय घेणाऱ्या खडसेंनी आता भाजपला मुख्यमंत्रीपद मिळवून देण्याचंही श्रेय आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न चालवलाय. मंत्रिपद गेल्यानंतरही खडसेंची मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा अजूनही कमी झालेली दिसत नाही. मात्र खडसेंच्या या विधानांनी विरोधकांना आयतं कोलीत मिळालं असून भाजपची डोकेदुखी वाढलीय. खडसेंनी तोंड उघडावंच, अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलीय.   


खडसेंनी नाव न घेता स्वपक्षीयांवरच वार केले आहेत.  खडसेंमधली मंत्रीपद गेल्याची खदखद यानिमित्तानं अधोरेखित झाली असली तरी यामुळंच खडसेंचा मंत्रिमंडळात परतीचा मार्ग खडतर झाल्याचं दिसतंय. आता भाजप किती काळ खडसेंना सत्तेबाहेर ठेवणार आणि किती काळ खडसे देशाला हादरवणारं सत्य दाबून ठेवणार हा खरा प्रश्न आहे.