रत्नागिरी : राज्यात शिवसेनेची युती झालीय खरी पण रत्नागिरी नगरपरिषदेसाठी शिवसेना-भाजप आमनेसामने आहेत. शिवसेनेकडून उदय सामंतांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादीनंही आपल्यालाच जनतेचा कौल मिळेल असा दावा केला असला तरी खरं चित्र 28 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही. कारण युती असलेली शिवसेना, भाजप रत्नागिरीत यावेळी मात्र एकमेकांच्या विरोधात उभी ठाकलीय. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी करून निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. पूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि आता शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागलीय. शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी राहुल पंडीत यांना संधी देण्यात आली आहे. तसंच स्पष्ट बहुमत आम्हालाच मिळेल असा दावा शिवसेना करत आहे.


गेल्या निवडणुकीत शिवसेना - भाजपने युती करून रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. तब्बल 23 नगरसेवक एकट्या युतीकडे होते. मात्र विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि शिवसेनेची नगराध्यक्षची टर्म असून देखील भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्यात युती करण्याची घोषणा झाली खरी. मात्र रत्नागिरीत शिवसेना-भाजपनं एकला चलोचा नारा दिला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष उमेदवारांची संधी पुन्हा भाजपने महेंद्र मयेकर यांनी दिली आहे. आमचीच सत्ता येणार असा विश्वास भाजपनं व्यक्त केला आहे.


तर आघाडीतर्फे राष्ट्रवादीला नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. आघाडीकडून उमेश शेट्ये यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. एकूण 30 पैकी 24 जागा राष्ट्रवादी तर 6 जागा काँग्रेस लढवणार आहे. आघाडीनंही रत्नागिरी परिषद जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.