पिंपरी-चिंचवड : काही महिन्यांपूर्वीच स्वच्छ शहर म्हणून राज्यात प्रथम आणि देशात ९ वा क्रमांक पटकवलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा आता पुरता भ्रमनिरास झालाय. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पिंपरी चिंचवड ९ व्या क्रमांकावरून थेट ७२ व्या क्रमांकावर फेकलं गेलंय. त्यामुळं केवळ पुरस्कारासाठीच ही योजना राबवली नव्हती ना असा सवाल उपस्थित होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेब्रुवारी २०१६ मध्ये मोठ्या दिमाखात स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार स्वीकारतानाचं हे छायाचित्र...पिंपरी चिंचवडला हा पुरस्कार मिळाल्यानंतर सगळ्यांचाच उर अभिमानाने भरून गेला होता. पण पिंपरी चिंचवडकरांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. 


केंद्र सरकारने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत शहराचा नंबर थेट ७२ वर गेलाय. अर्थात ते योग्यच ही आहे म्हणा.बघावे तिकडे कचरा, घाण, नदी पात्रांची अवस्था तर गटार गंगेसारखी झालेली आहे. आता नुकत्याच आलेल्या या सर्वेक्षणामुळं सगळेच कामाला लागू असं सांगतायत...!


मुळात कोणतीही योजना राबवताना त्यात सातत्य असणं गरजेचं असतं. पण पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आलेले नाही हेच खेदाने म्हणावे लागेल. केवळ शहरातील चकचकीत रस्ते आणि झालेल्या विकासावर भुलून न जाता त्यात सातत्य राखण्याची गरज आहे हेच क्लीन सिटी यादीवरून अधोरेखित होतंय हे नक्की.