मुंबई : राज्यातील 25 जिल्ह्यांमधील तब्बल 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 5.30 वा. हे मतदान संपणार आहे. भाजप शिवसेना युतीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने निमशहरी मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे युतीची विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीच्या निर्णयानंतर होणा-या या निवडणुकीचा कौल कुणाला मिळतो हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. 164 नगरपालिकांमध्ये थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होतेय हे सुद्धा या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठीच्या 164 जागांसाठी एक हजार 13 उमेदवार रिंगणात आहेत.


नगरसेवकांच्या तीन हजार 733 जागांसाठी 15 हजार 827 उमेदवार नशिब आजमावतायत. नगरपालिकांमध्ये दोन किंवा तीन सदस्यीय प्रभाग पद्धत असून नगर पंचायतींमध्ये मात्र एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. बत्तीस शिराळामध्ये नागरिकांनी बहिष्कार टाकल्याने आता १७ नगर पंचायतींसाठी मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीचा निकाल सोमवारी दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे.