नाशिक : मुखी हरिनामाचा गजर आणि अंतकरणी विठुरायाच्या दर्शनाची ओढ असलेला वारकरी भागवत धर्माची पताका खान्द्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेनं निघालाय. त्रंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवलेल्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा आजचा तिसरा मुक्कम पळसे गावात आहे.


एक एक दिवस आपण विठूमाउलीच्या जवळ जात असल्याचा आनंद वारकऱ्यांचा चेहऱ्यावर दिसतोय. सावळ्या विठ्ठ्लायाच्या भक्तीरसात तल्लीन झालेले हे वारकरी ५०-६० किलोमीटरचा प्रवास करून आज पळसे गावात मुक्कामी आहेत. तत्पूर्वी ह्या माउली मंडळींचा दुपारचा मुक्काम नाशिकरोडच्या मुक्तिधाम मंदिरात होता. पावसाने पाठ फिरविल्याने रणरणत्या उन्हात फिरणाऱ्या ह्या वारकरी मंडळींनी दुपारचा काही काळ या मंदिरातच आराम केला. आरामाच्या कालवधीतही विठ्ठल नामाची शाळा भरली होती. जो तो भजन किर्तनात दंग होता.