कृष्णात पाटील, मुंबई : एक जीवघेणा रोग म्हणून साधारण पंधरावर्षांपूर्वी ज्या एड्सनं साऱ्या जगात दहशत माजवली. तो एड्स आता सर्वांकश प्रयत्नांनी तो नियंत्रणात आलाय. रुग्ण पूर्ण बरा करण्याचं औषध अजूनही सापडलेलं नाही. पण, अनेक जण या रोगासोबत झगडून आयुष्यातल्या चांगल्या क्षणांचा आनंद घेत आहेत. शिवाय रोगाचं समूळ उच्चाटनही आता दृष्टीक्षेपात आलंय असं म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीड दशकापूर्वी एडस् या रोगानं जगभरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. साऱ्या जगासाठीच नवीन असलेल्या या रोगानं सर्वांच्याच मनात भीती निर्माण केली होती. पण आता चित्र पालटतंय. सध्या एडस बाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होतंय. आकडेवारी सुखावह असली तरी या रोगाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. तसंच हा रोग पूर्णपणे बरा होईल असे औषधही नसल्याने या रोगाला आजही अनेक जण बळी पडताय.


काही उल्लेखनीय गोष्टी...


२००० सालामध्ये देशात एडसची लागण झालेल्यांची संख्या तब्बल २ लाख ५१ हजार होती. पण आता एडस रूग्णांची संख्या ८६ हजारापर्यंत खाली आलीय. रूग्णसंख्येत ६६ टक्क्यांनी घट झालीय.


मुंबईतही गेल्या १० वर्षात ४४ टक्क्यांनी घट झालीय. 


२००५ मध्ये मुंबईत एडस रूग्णांची संख्या १२ हजार इतकी होती,ती २०१५ मध्ये ७२८३ वर आलीय.


वेश्या, समलैंगिक संबंध ठेवणा-यांमध्ये एडसचे प्रमाण कमी होत आहे. 


तरी स्थलांतरीत कामगार, वाहन चालक, रोजंदारीवरचे कामगारामध्ये सध्या रोगाचे प्रमाण अधिक दिसतं. 


९१ टक्के रूग्णांना असुरक्षित लैंगिक संबंधामुळं एडसची लागण झालीय.


तर ५.७ टक्के प्रमाण हे आईकडून मुलांना होण्याचे असून,


रक्तसंक्रमण, इंजेक्शनच्या माध्यमातून लागण होण्याचे नगण्य आहे. 


एडस् रूग्णांवर भारतात सध्या एआरटी ही औषध उपचार पद्धती सरकारतर्फे मोफत पुरवली जाते.औषध नियमित घेतल्यास या रोगाचे विषाणू नियंत्रणात ठेवून प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळं रूग्ण दैनंदिन काम करू शकतो.