मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करून कोर्टाच्या आदेशांची पायमल्ली केल्याप्रकरणी मनसेला अवमान नोटीस पाठवण्यात आली आहे. मनसेनं जाणीवपूर्वक आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याबाबत कोर्टानं संताप व्यक्त केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभेवेळी ध्वनीपातळी 50 डेसिबलच्या वर जाणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश हायकोर्टानं परवानगी देताना दिले होते. मनसेनं याला सहमती दर्शवली होती. मात्र वाजतगाजत येणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे सभेपूर्वीच मर्यादा 100 डेसिबलच्या पुढे गेल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. सभेत आवाजाची मर्यादा ओलांडली गेल्याचं पक्षानंही मान्य केलंय. मात्र शिवाजी पार्क सायलेन्स झोन असला, तरी तिथे आवाजाची पातळी नेहमीच 80 डेसिबलच्या वर असते, असा दावा मनसेनं केलाय.


या दाव्याला पुष्टी देण्यासाठी सभेच्या दिवशी सकाळी आवाजाची पातळी 88 पूर्णक 8 डेसिबल असल्याचा दावा केलाय. मात्र आवाज फाऊंडेशनच्या आकडेवारीनुसार संध्याकाळी ध्वनीमर्यादा 114 पूर्णांक 6 डेसिबलपर्यंत गेलीये. राज ठाकरेंच्या भाषणावेळीदेखील मर्यादा 101 डेसिबलच्या वर गेल्याचं आवाजची आकडेवारी सांगते.