मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि 'मातोश्री' ही दोन नावे मुंबईकरांना परिचयाची आहेत. आता आणखी एका नावाची भर पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नवा बंगला 'मातोश्री-2'चे उभा राहत आहे. त्याच्या बांधकामाला सुरुवात झालेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांद्रा येथे 'मातोश्री' बंगल्याजवळ कलानगरमध्येच ही आलिशान सहा मजली इमारत उभी राहत आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये कलानगरमधील एक जागा 11.60 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. त्यातील 10 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त जागेवर ते आपलं नवं घर बांधत असल्याचे वृत्त 'मुंबई मिरर’ने दिलेय.


असा असणार 'मातोश्री-2' !


'मातोश्री-2' ही इमारत 'तलाटी अँड पांथकी' ही प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी बांधत आहे. या इमारतीत बेसमेंट, स्टिल्ट आणि सहा मजले आहेत. त्यातील प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरुम, एक स्टडी रुम, असणार आहे.  


ही जागा कोणाच्या नावे...


या जागेवर कलाकार के. के. हेब्बर राहत होते. 1916 मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर ही जागा त्यांची पत्नी सुशीलाच्या नावावर झाली होती. 2007 साली सुशीला यांच्या मुलांनी ही जागा प्लॅटिनम इंफ्रास्ट्रक्चरला 3.5 कोटी रुपयांमध्ये विकली. प्लॅनेटियमचे मालक राजभूषण आणि जगभूषण दीक्षित यांनी या जागेवर आठ मजली इमारत बनवण्याची परवानगी घेतली होती. 


50 टक्के रक्कम राज्य सरकारला


हेब्बार कुटुंबाचा दोन मजली बंगला प्लॅटिनमने त्यांच्या प्रोजेक्टसाठी पाडला. 2016 मध्ये जागा विकण्याची परवानगी प्लॅटिनमला मिळाली. या मोबदल्यात मिळणारी 50 टक्के रक्कम राज्य सरकारला दिली जावी, या अटीवर प्लॅटिनमला एप्रिल 2016 मध्ये हस्तांतरणाची परवानगी देण्यात आली.


ना-हरकत प्रमाणपत्र


कलानगर सहकारी सोसायटीकडून ठाकरे कुटुंबाने या जमिनीच्या अधिग्रहण आणि पुनर्विकासासाठी ना-हरकत प्रमाणपत्र घेतलं आणि ऑक्टोबर 2016 मध्ये ठाकरे कुटुंबियांनी ही जागा 11.60 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचे 'मुंबई मिररने' म्हटले आहे.


बांधकामाची परवानगी


ठाकरे कुटुंबाने ही जागा खरेदी करताना प्लॅनेटियम कंपनीला 5.8 कोटी रुपये मोजले आणि 5.8 कोटी रुपये उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा केले. याव्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटीसाठी 58 लाख रुपयेही ठाकरे कुटुंबाने भरल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्यानंतर तात्काळ 17 ऑक्टोबर 2016 रोजी मुंबई महापालिकेने ठाकरे कुटुंबियांनी बांधकामाची परवानगी दिल्याचे वृत्तात म्हटलेय.