नाशिक: हिंगणघाट जळीतकांडाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आता नाशिकच्या लासलगाव बसस्थानकावर एका विधवा महिलेला भरदिवसा जाळण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. चार ते पाच मुलांनी या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळले. या घटनेमुळे लासलगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही महिला ४० टक्के भाजली असून तिला लासलगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात येणार आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतल्याचेही समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगणघाट जळीतकांड : 'तिने मला शेवटचं पाहिलं देखील नाही'


हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याची प्राथमिकी माहिती समोर आली आहे. ही महिला पिंपळगावमध्ये राहणारी आहे. तिचे एका तरुणाशी अनैतिक संबंध होते. मात्र, या तरुणाचे लग्न ठरल्यामुळे दोघांच्या संबंधांमध्ये दुरावा आला होता. यानंतर या महिलेने तरुणाचा साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न केला. याच रागातून या तरुणाने आपल्या मित्रांसह या महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला.



हिंगणघाट । जळीतकांड प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात


काही दिवसांपूर्वीच वर्ध्याच्या हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्यात आल्याचा प्रकार घडला होता. तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या पीडितेचा मृत्यू झाला होता. यानंतर हिंगणघाटसह राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या तरुणीला पेटवून देणाऱ्या विकेश नगराळे या नराधमाला फाशी द्यावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिंगणघाट खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन दिले होते. तसेच हा खटला लढवण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती.