सुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; `या` ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले
Indian Railway : मोठी सुट्टी पाहता अनेकांनीच भटकंतीसाठी बाहेर जाण्याचे बेत आखले. बरं, काहींनी तर वर्षाच्या सुरुवातीलाच या आठवड्यासाठीचे बेत आखले होते. पण, त्यातल्या काही मंडळींना आयत्या वेळी प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काही मंडळींसाठी ही अडचणीच्या आधीची पूर्वसूचनाच असणार आहे. कारण, सुट्ट्यांदरम्यानच रेल्वे विभागानं काही महत्त्वाची कामं हाती घेतल्यामुळं आयत्या वेळी निवडक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार भुसावळ- जळगाव विभागामध्ये रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार असून, काही महत्त्वाची कामं पूर्ण केली जाणार आहेत. ज्याअंतर्गत 12 आणि 14 ऑगस्ट रोजी सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस (11039), आणि 13 जबलपूर-पुणे एक्स्प्रेस (02132), नागपूर-पुणे एक्स्प्रेस (12114) रद्द करण्यात आली आहे.
14 आणि 15 ऑगस्टला मुख्य ब्लॉक घेण्यात येणार असला तरीही 13 आणि 16 तारखेलाही काही गाड्या रद्द राहतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. महत्त्वाची बाब म्हणजे मनमाड रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या तब्बल 33 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
14 ऑगस्टला निघणारी पुणे-जबलपूर (02131), पुणे-नागपूर (12113), पुणे-नागपूर (12113) आणि 15 ऑगस्टसाठीची निर्धारित पुणे-नागपूर एक्स्प्रेस (12135) रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या एकूण चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून यामध्ये शनिवार (कोल्हापूर), सोमवार (गोंदिया)सह, 15 आणि 16 तारखेसाठीच्या रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस (11077), पुणे-दानापूर एक्स्प्रेस (12149), वास्को-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस (12779) चे मार्ग वळवण्यात आले असून, आता या रेल्वे लोणावळा-वसईरोड-उधना-जळगावमार्गे धावतील.
सु्ट्टीच्या दिवसांमध्ये अनेकांनीच लांब पल्ल्याच्या रेल्वेनं प्रवासासाठीची तिकिटं काढलेली असताना अखेरच्या क्षणी प्रवाशांना हा धक्का बसला आहे. त्यामुळं बऱ्याचजणांची गैरसोय झाली असून, आता काहीजणांनी आपला रोख खासगी बस वाहतुकीकडे वळवला आहे.
तुमच्या ओळखीतलं किंवा कुटुंबातलं कोणी जर रेल्वेनं प्रवास करणार असेल तर त्यांना या बदलांची पूर्वकल्पना द्या. कारण, सध्या सुट्टीमुळं बहुतांश ठिकाणं, रेल्वे स्थानक, बस स्थानकं माणसांनी गजबजलेली आहेत. त्यामुळं गोंधळात गोंधळ उडायला नको.