सर्वोच्च नागरी पुरस्कार! कोण आहेत यंदाचे 5 भारतरत्न पुरस्कार्थीं?

Pravin Dabholkar Fri, 09 Feb 2024-2:51 pm,

Bharat Ratna: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2024 साठी भारतरत्न पुरस्कारार्थ्यांची नावे जाहीर केली आहे. देशासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या 5 दिग्गजांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्ती आहेत. भारतरत्न पुरस्कार दिला जाणाऱ्या व्यक्तींनी उभी हयात देशासाठी घालविलेली असते. तर अनेकांना हा पुरस्कार तर मरणोत्तर प्रदान करण्यात येतो. 

2024 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, माजी पंतप्रधान आणि जाट नेता चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव, हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यांच्याबद्दल जाणून घेऊया. 

लालकृष्ण आडवाणी हे वयाच्या 14 व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यांसोबत लालकृष्ण आडवाणी यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. लालकृष्ण आडवाणी हे भाजपचा राम मंदिर जन्मभूमीचा राजकीय चेहरा म्हणून समोर आले. त्यांनी 1990 मध्ये काढलेली राम रथ यात्रा ऐतिहासिक ठरली. 2015 मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे दोन वेळा बाहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना जन-नायक म्हटले गेले. कार्पूरी  ठाकूर यांनी भारत छोडो आंदोलनावेळी 26 महिने तुरुंगात घालवले. 22 डिसेंबर 1970 ते 2 जून 1971 आणि 24 जून 1977 ते 21 एप्रिल 1979 या काळात त्यांनी दोनदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.

चौधरी चरण सिंग यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. इथपासून ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. चौधरी चरणसिंग हे देशाचे पाचवे पंतप्रधान होते. राजकारणाच्या सुरुवातीपासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत ते शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत राहिले. शेतकरी नेता म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावरून संसदेपर्यंत मांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांना शेतकऱ्यांचा मसिहा म्हटले जात असे.

पीव्ही नरसिंह राव, स्वतंत्र भारताचे 9 वे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 28 जून 1921 रोजी आंध्र प्रदेशातील करीम नगर या छोट्याशा गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव पामुलापर्थी व्यंकट नरसिंह राव होते. पीव्ही नरसिंह राव हे राजकारणाव्यतिरिक्त कला, साहित्य, संगीत इत्यादी विविध क्षेत्रातील तज्ञ होते. त्यांना भाषांमध्ये जास्त रस होता. त्यांनी त्यांच्या संभाषणात वेगवेगळ्या भाषा वापरल्या. नरसिंह राव यांचे 23 डिसेंबर 2004 रोजी निधन झाले.

डॉ. स्वामीनाथन यांनी 1972 ते 1979 दरम्यान भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक आणि भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम केले. कृषी जगतातील त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना 1971 मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्कार आणि 1987 मध्ये जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एमएस स्वामीनाथन यांना 1967 मध्ये पद्मश्री, 1972 मध्ये पद्मभूषण आणि 1989 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link