मुंबई : १ डिसेंबर २००६ला भारतानं पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला. मागच्या ११ वर्षांमध्ये भारताच्या टी-20 टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. या ११ वर्षामध्ये भारत एकदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. तर आयपीएल भारतातच नाही तर जगभरात सर्वाधिक लोकप्रिय झालेला खेळ बनला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११ वर्षांपूर्वी झालेल्या या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. २० ओव्हरमध्ये आफ्रिकेनं ९ विकेट्स गमावून १२६ रन्स बनवले होते. १२७ रन्सचा पाठलाग करताना भारतानं १ बॉल आणि ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.



मागच्या ११ वर्षांपासून सतत टी-20मध्ये भारताकडून खेळणारा खेळाडू म्हणजे एम.एस.धोनी. धोनीच्याच नेतृत्वात भारतानं २००७ साली झालेला पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.



भारताच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये सचिन तेंडुलकरही खेळला होता. सचिनच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीमधली ही एकमेव मॅच होती. या मॅचमध्ये सचिननं १२ बॉल्समध्ये १० रन्स केल्या होत्या आणि एक विकेटही घेतली होती.



२००६पासून ते आत्तापर्यंत भारताकडून खेळणारे दोन खेळाडू म्हणजे धोनी आणि दिनेश कार्तिक. दिनेश कार्तिक गेल्या ११ वर्षात टीममधून आत-बाहेर होत आहे. ९ जुलै २०१७ ला कार्तिक शेवटची टी-20 खेळला. पहिल्या टी-20मध्ये कार्तिकला मॅन ऑफ द मॅच किताब देऊन गौरवण्यात आलं. या मॅचमध्ये कार्तिकनं नाबाद ३१ रन्स बनवल्या होत्या. 



भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-20 मॅचचं नेतृत्व वीरेंद्र सेहवागनं केलं होतं. सेहवागनं या मॅचमध्ये २९ बॉल्समध्ये ३४ रन्स बनवल्या होत्या. सेहवागनं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कॉमेंट्री करत आहे.



सुरेश रैनानं या मॅचमध्ये ४ बॉल्समध्ये ३ रन्स केल्या होत्या. रैना १ फेब्रुवारी २०१७पासून भारतीय संघातून बाहेर आहे. फिटनेसमुळे रैना भारताच्या वनडे आणि टेस्ट टीममधूनही बाहेर आहे.



२००६ साली झालेल्या पहिल्या टी-20च्या टीममध्ये दिनेश मोंगियाही होता. या मॅचमध्ये मोंगियानं ४५ बॉल्समध्ये ३८ रन्स केल्या होत्या. दिनेश मोंगिया २००० ते २००३मध्ये भारताच्या वनडे टीमचा हिस्सा होता. २००३ वर्ल्ड कपमध्येही मोंगिया खेळला होता. भारताकडून मोंगियानं ५७ वनडे आणि एक टी-20 खेळला. सध्या मोंगिया पंजाब क्रिकेट असोसिएशनचा सिलेक्टर आहे. 



भारतानं खेळलेल्या पहिल्या टी-20मध्ये अजित आगरकरचाही समावेश होता. या मॅचमध्ये आगरकरनं २.३ ओव्हर्समध्ये १० रन्स देऊन २ विकेट घेतल्या होत्या. २०१३मध्ये आगरकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सध्या आगरकर टीव्हीवर क्रिकेट एक्सपर्ट म्हणून दिसतो. धोनीला टी-20मधून निवृत्त व्हायचा सल्ला दिल्यानंतर आगरकरवर काहीच दिवसांपूर्वी टीका झाली होती.



या मॅचमध्ये हरभजन सिंगनं ३ ओव्हरमध्ये २२ रन्स देऊन एक विकेट घेतली होती. २०१६मध्ये हरभजननं शेवटची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळली. आयपीएलमध्ये हरभजन मुंबईकडून खेळतोय. हरभजन २०१६ च्या आशिया कपमध्ये शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला.



५ वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेला इरफान पठाण भारताची पहिली टी-20 मॅच खेळला होता. या मॅचमध्ये इरफाननं ४ ओव्हरमध्ये ३० रन्स देऊन एक विकेट घेतली होती.



श्रीसंतनं या मॅचमध्ये ४ ओव्हरमध्ये ३३ रन्स देऊन एक विकेट घेतली होती. २०१३ साली आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्यानंतर श्रीसंत टीममधून बाहेर आहे.



झहीर खाननं या मॅचमध्ये ४ ओव्हर्समध्ये १५ रन्स देऊन २ विकेट घेतल्या होत्या. ऑक्टोबर २०१५मध्ये झहीरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.