मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर आता बीसीसीआय आणि भारतीय टीम व्यवस्थापनामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भुवनेश्वर कुमार फिट नव्हता तरी त्याला तिसऱ्या वनडेमध्ये का संधी देण्यात आली असा सवाल आता उपस्थित होत आहे. भुवनेश्वरबद्दल भारतीय टीमचे फिजिओ पॅटिक फरहर्ट आणि ट्रेनर शंकर यांच्या भूमिकवरून वाद निर्माण झाला आहे. आयपीएलनंतर भुवनेश्वर कुमारला पाठीच्या दुखापतीनं सतावलं आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या काही मॅचना भुवनेश्वरला मुकावं लागलं. तिसऱ्या वनडेमध्ये भुवनेश्वरला संधी देण्यात आली मग टेस्ट टीममधून त्याला वगळण्यात आलं.


बीसीसीआयचा रवी शास्त्रीवर निशाणा


दुखापत असल्यामुळे भुवनेश्वर कुमारला टेस्ट मधून वगळलं असेल तर मग फिट नसतानाही भुवनेश्वरला तिसऱ्या वनडेमध्ये का खेळवण्यात आलं असा सवाल उपस्थित करण्यात आला. या प्रश्नावरून बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं रवी शास्त्रीवर निशाणा साधला आहे. हा प्रश्न तुम्ही रवी शास्त्रीलाच विचारा. भुवनेश्वर कुमारची दुखापत वाढली आहे. तो पुर्णपणे फिट नाही याचा स्वीकार आम्ही करायला हवा होता. जर तो टेस्ट टीमच्या रणनितीचा महत्त्वाचा हिस्सा होता तर मग त्याला शेवटच्या वनडेमध्ये खेळवण्याची गरज काय होती, असा संतप्त सवाल या अधिकाऱ्यानं विचारला. या सगळ्यांची उत्तरं टीम व्यवस्थापनाला द्यावी लागतील, असं हा अधिकारी म्हणाला.