Kuldeep Yadav: भारत आणि इंग्लंडदरम्यान आजपासून पाचव्या कसोटीला धर्मशाला स्टेडिअमध्ये (Dharmashala) सुरु झाला. टॉस जिंकून इंग्लंडने पहिली फलंदाजी केली. पण त्यांच्या हा निर्णय टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कुलदीप यादवने आपल्या कसोटी कारकिर्दीत चौथ्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली. कुलदीपने इंग्लंडची पहिली फळी उद्ध्वस्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मशालामध्ये कुलदीपचा गदर
धर्मशाला कसोटीत इंग्लंडची सुरुवात दमदार झाली. एकवेळ अशी होती, इंग्लंडने 25 षटकात 100 धावा करत फक्त एक विकेट गमावली होती. इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच पुढच्या 75 धावात इंग्लंडने पाच फलंदाज गमावले. इंग्लंडची अवस्था 175 वर 6 विकेट अशी झाली. कुलदीप यादवने पाच विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजीला भगदाड पाडलं. याबरोबरच कुलदीपच्या नावावर एक अनोखं अर्धशतकही जमा झालंय. कुलदीप यादवने कसोटी कारकिर्दीत 50 विकेटचा टप्पा पूर्ण केलाय. कुलदीप यादव, अक्षर पटेल, इरापल्लीप्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर यांनी 12 कसोटी सामन्यात 50 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. रविचंद्रन अश्विन भारताचा सर्वात वेगवान 50 विकेट घेणारा गोलंदाज आहे. अश्विनने अवघ्या 9 कसोटी सामन्यात 50 विकेट घेतल्यात.


कुलदीप यादवने इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन डकेट, ओली पोप, जॅक क्राऊली, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या प्रमुख फलंदाजांच्या विकेट घेतल्या. 


आर अश्विनची कमाल
कुलदीप यादवबरोबर आर अश्विननेही चार विकेट घेण्याची कमाल केली. अश्विनने अवघ्या 51 धावात चार विकेट घेतल्या. कुलदीप यादवने पहिली फळी बाद केली. तर अश्विनने इंग्लंडचं शेपूट जास्त वळवळू दिलं नाही. शेवटचे पाच फलंदाज अवघ्या 43 धावात पॅव्हेलिअनमध्ये परतले. 


देवदत्त पडिक्कलचं पुनरागमन


धर्मशाला कसोटीत टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले. युवा फलंदाज रजत पाटीदारच्या जागी डाव्या हाताचा फलंदाज देवदत्त पडिक्कलला संधी देण्यात आली. देवदत्त पडिक्कलने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या कसोटी मालिकेत भारताकडून तब्बल पाच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. याआधी रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराज खान आणि आकाश दीपने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा अशी घटना घडलीय.