मुंबई : यंदाच्या वर्षी आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नईच्या संघात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा असल्यामुळं या पर्वाला आतापासूनच वादाची किनार मिळण्यास सुरुवात झाली आहे. IPL 2020 पासून वेगळं होण्याचा निर्णय घेत मायदेशी माघारी आलेल्या क्रिकेटपटू suresh raina सुरेश रैना यानं अखेर मौन सोडलं आहे. ट्विट करत रैनानं याबाबतची माहिती दिली आहे. पण, यावेळी समोर आलेलं कारण मात्र वेगळं असल्याचं पाहायला मिळालं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत सांगताना सुरेश म्हणाला, 'पंजाबमध्ये माझ्यासोबत जे झालं ते अतिशय धक्कादायक होतं. माझ्या काकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. माझी आत्या आणि दोन्ही आतेभाऊसुद्धा या हल्ल्यात जबर जखमी झाले आहेत. माझ्या एका आतेभावाची मृत्यूशी सुरु असणारी झुंज दुर्दैवानं अपयशी ठरली. माझ्या आत्याचीही प्रकृती सध्या गंभीर असून, ती लाईफ सपोर्टवर आहे.'


दुसरं एक ट्विट करत त्यानं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंजाब पोलिसांना टॅग करत लिहिलं, 'आतापर्यंत आम्हाला हे नाही ठाऊक की, त्या रात्री नेमकं झालं तरी काय आणि नेमका हा हल्ला कोणी केला. पोलिसांनी कृपया या प्रकरणात लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो. कमीत कमी हे केलं कोणी, याविषयीची माहिती तरी आम्हाला हवी आहे. असा अपराध करणाऱ्या अपराध्यांना सोडून चालणार नाही'. 


रैनाच्या कुटुंबाला जबर हादरा देणारी ही घटना पंजाबच्या पठाणकोटमध्ये घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रैनाच्या ५८ वर्षीय काकांवर काही बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला होता. ५ सदस्य असणारं त्यांचं कुटुंब घराच्या छतावर झोपलं होतं. तेव्हाच 'काले कच्छेवाला गँग' नावाच्या टोळीनं माधोपूर भागातील थारियाल गावात हा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. 



 


अशोक कुमार असं रैनाच्या काकांचं नाव असून, ते एक सरकारी कंत्राटदार होते. दरम्यान, या हल्ल्यात त्यांची ८० वर्षीय आई सत्य देवी, पत्नी आशा देवी, मुलगा अपिन आणि कौशल वाईट पद्धतीनं जखमी झाले.