नवी दिल्ली : मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीनं २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १७४ रन केल्या आहेत. दिल्लीच्या ऋषभ पंतनं ४४ बॉलमध्ये ६४ रनची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. विजय शंकरनं ३० बॉलमध्ये नाबाद ४३ रन केल्या. शंकरनं ३ फोर आणि २ सिक्स लगावल्या. मुंबईकडून कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह आणि मयंक मार्कंडेला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. मुंबईनं ही मॅच हरली तर प्ले ऑफमध्ये क्वालिफाय करण्याचं त्यांचं स्वप्न भंगेल. याआधी हैदराबाद, चेन्नई आणि कोलकात्याच्या टीम प्ले ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. दिल्लीची टीम याआधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. दिल्लीनं १३ पैकी ४ मॅच जिंकत ८ पॉईंट्स कमावले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये १३ पैकी ६ मॅच जिंकल्यामुळे त्यांच्या खात्यात १२ पॉईंट्स आहेत.