ICC World Cup :  आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहत शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची (Team India) विजयी घोडदौड सुरुच आहे. टीम इंडियाने सलग सहा सामने जिंकत पॉईंटटेबलमध्येही (Point Table) अव्वल स्थान पटकावलं आहे. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशचा पराभव केल्यानंतर  टीम इंडियाने गतविजेत्या इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला. रविवारी लखनऊच्या एकाना स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने 229 धावांचं लक्ष ठेवलं. पण हे माफक आव्हान पार करताना इंग्लंडचा (England) संघ अवघ्या 129 धावांवर ऑलाऊट झाला आणि टीम इंडियाने तब्बल 100 धावांनी विजय मिळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा खेळाडू अडचणीत
टीम इंडियाने इंग्लंडवर शानदार विजय मिळवला असला तरी टीम इंडियातला एक खेळाडू चांगलाच अडचणीत सापडला आहे. या खेळाडूचं नाव आहे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer). या विश्वचषक स्पर्धेत श्रेयस अय्यरची आतापर्यंतची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरला केवळ चार धावा करता आल्या. यासाठी त्याने तब्बल 16 चेंडू घेतले. अय्यरने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात केवळ 134  धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 84 इतका आहे. पण प्रश्न त्याच्या धावांचा नाही तर तो आऊट होण्याच्या पद्धतीवर आहे. 


शॉर्ट बॉल खेळताना अडचण
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यर आखूड टप्प्याच्या चेंडूवर आऊट झाला. आखूड टप्प्याचा चेंडू हा श्रेयस अय्यरचा विक पॉईंट आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही श्रेयस अय्यर अशाच पद्धतीने आऊट झाला होता. एकाच पद्धतीने बाद होत गेल्याने विरोधी संघाला त्या खेळाडूची कमकुवत बाजू कळते आणि सामन्यात नेमक्या त्याच गोष्टीचा फायदा उचलला जातो. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी अय्यरची हीच कमकुवत बाजू हेरली होती. पहिल्या सामन्यातपासून सहाव्या सामन्यापर्यंत श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. 


ईशान किशन चांगला पर्याय
श्रेयस अय्यर फ्लॉप ठरत असेल तर टीम इंडियाकडे ईशान किशनच्या रुपाने चांगला पर्याय उपलब्ध आहे. ईशान किशन मधल्या फळीतही चांगली फलंदाजी करु शकतो, आणि त्याने हे वारंवार दाखवूनही दिलंय. विशेष म्हणजे ईशान किशन डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि याचा संघाला चांगला फायदा होऊ शकतो. शिवाय आखूड टप्प्याच्या चेंडूवर खेळण्याचा ईशान किशनचा हातखंडा आहे. 


टीम इंडियाचं सेमीफायनलचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. अशात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियात काही नवे प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही.