India vs West Indies: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिकेचीही विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखत विजय मिळवला. ब्रिजटाउनच्या केंसिंग्टन मैदानात झालेल्या सामन्यात भारताने फक्त 115 धावांमध्येच वेस्ट इंडिज संघाला बाद केलं. भारताने फक्त 22.5 ओव्हर्समध्येच हे आव्हान पूर्ण केलं. यासह भारताने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या सलग नवव्या विजयाची नोंद केली. आता 29 जुलैला दुसरा सामना होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर प्रभावी कामगिरी करु शकले नव्हते. दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांची वाईट कामगिरी सुरुच असल्याचं दिसत आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. 45 धावातच त्यांनी 3 विकेट गमावले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार शाई होप यांनी 43 धावांची भागीदारी केली. 


29 धावांत 7 विकेट्स


यानंतर वेस्ट इंडिज संघ चांगली धावसंख्या उभारत भारताला आव्हान देईल असं वाटलं होतं. पण वेस्ट इंडिडचे फलंदाज पुरते ढेपाळले. त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. 16 व्या ओव्हरमध्ये हेटमायर बाद झाल्यानंतर मागील फलंदाजांनी तर विकेट्सची रांग लावली. आधी रवींद्र जाडेजा आणि नंतर कुलदीप यादवने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना तंबूत धाडलं. कुलदीपने तर आपल्या तीन ओव्हर्समध्ये 4 विकेट घेत वेस्ट इंडिजला 23 ओव्हर्समध्येच सर्वबाद केलं. 



वेस्ट इंडिजने फक्त 26 धावांमध्ये आपले शेवटचे 7 विकेट गमावले. भारताकडून कुलदीप यादवने 6 धावा देत 4 विकेट्स मिळवले. तर रवींद्र जाडेजाने 37 धावा देत 3 विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूर, हार्दिक पांड्या आणि मुकेश कुमार यांना प्रत्येक एक विकेट मिळाली. 



वेस्ट इंडिज संघ फक्त 114 धावा करु शकला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरोधातील ही त्यांची सर्वात कमी असणारी दुसरी धावसंख्या आहे. दुसरीकडे, घरच्या मैदानावर भारताविरोधातील ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या ठरली. याआधी 1997 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर संघ फक्त 121 धावा करु शकला होता. 


वेस्ट इंडिजची भारताविरोधातील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या


104 तिरुवनंतपुरम 2018
114 ब्रिजटाउन 2023*
121 पोर्ट ऑफ स्पेन 1997
123 कोलकाता 1993
126 पर्थ 1991


कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांनी दोघांनी मिळून एकूण सात विकेट्स घेतल्या. यासह रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांनी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. जाडेजा आणि कुलदीप यादव सात किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारी पहिली भारतीय लेग-स्पिन जोडी ठरली आहे. यासह क्रिकेटच्या इतिहासात भारताने चौथ्यांदा विरोधी संघाला 23 ओव्हर्स किंवा त्याच्या आधी सर्वबाद केलं. 


भारतीय संघाला 115 धावांचं आव्हान पूर्ण करताना जास्त संघर्ष करावा लागला नाही. पण भारतीय संघाने फलंदाजीत काही आश्चर्यकारक बदल केले. ईशान किशनला शुभमनसह पहिल्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. विराट कोहली पाच विकेट्स पडल्यानंतरही फलंदाजीला आला नाही. तर रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.