मुंबई : देशभरात कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिकेची वनडे सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. १५ तारखेला लखनऊ आणि १८ तारखेला कोलकात्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उरलेल्या दोन वनडे मॅच होणार होत्या. धर्मशाळामधली सीरिजची पहिली वनडे पावसामुळे रद्द झाली होती.



सुरुवातीला या दोन्ही मॅच प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता, पण आता सीरिजच रद्द करण्याचं निश्चित झालं आहे. याआधी २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएलही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ एप्रिलपर्यंत आयपीएल स्पर्धा पुढे ढकलल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे.