राजकोट : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतली पहिली वनडे गमावल्यानंतर भारताला सीरिज वाचवण्यासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. दुसऱ्या वनडेमध्ये भारताने टीममध्ये दोन बदल केले आहेत. ऋषभ पंतला दुखापत झाल्यामुळे त्याच्याऐवजी केएल राहुल विकेट कीपिंग करणार आहे. ऋषभ पंतऐवजी मनिष पांडे आणि शार्दुल ठाकूरऐवजी नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला होता. २५५ रनवर भारताचा ऑलआऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता ही मॅच जिंकली होती. भारताचा हा वनडे क्रिकेटमधला सगळ्यात मोठा पराभव होता. डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांनी नाबाद शतकी खेळी केली होती.


ऑस्ट्रेलियाची ही टीम खूप मजबूत आहे आणि त्यांच्याविरुद्ध पुनरागमन करणं कठीण आव्हान असेल, असं विराट कोहली म्हणाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात लागोपाठ ४ वनडे मॅच गमावल्या आहेत. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी भारताने सीरिजच्या पहिल्या २ मॅच जिंकल्या, पण उरलेल्या तिन्ही मॅचमध्ये भारताला पराभवाचा धक्का लागला. यामुळे भारताने मागच्यावर्षी वनडे सीरिज ३-२ने गमावली होती. आजची मॅच गमावली तर भारत घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लागोपाठ २ सीरिज गमावेल.


भारतीय टीम


रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (विकेट कीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह


ऑस्ट्रेलियन टीम


डेव्हिड वॉर्नर, एरॉन फिंच (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, एश्टन टर्नर, एलेक्स कॅरी (विकेट कीपर), एश्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन, एडम झम्पा