मुंबई : नियती फार क्रूर असते, या वाक्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. भारतीय क्रिकेटपटूवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 2 आठवड्यात या क्रिकेटपटूने आपल्या जवळच्या 2 व्यक्ती गमावल्या आहेत. बडोद्याकडून खेळणाऱ्या विष्णू सोलंकीच्या (Vishnu Solanki) नवजात मुलीचं काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता विष्णूच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला आहे. विष्णूचं नशीब इतकं वाईट की त्याला आपल्या वडिलांचं अंत्यदर्शनही व्हीडिओ कॉलवरुन घ्यावं लागलं. (indian cricketer vishnu solanki losed her father after his new born daughter)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विष्णूला 10 फेब्रुवारीला कन्यारत्न प्राप्त झालं. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशीच विष्णुच्या चिमुरड्या मुलीचं निधन झालं. आपल्याला मुलगी झाली, ही भावना फार आनंददायी असते. मात्र दुर्देवाने हा आनंद दिवसभरही टिकू शकला नाही. नवजात मुलीचा मृत्यू झाला तेव्हा विष्णू बायो-बबलमध्ये होता. मात्र यानंतर विष्णू बायो-बबलचमधून बाहेर पडून मुलीच्या अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी गेला.


विष्णू सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर पुन्हा मैदानात परतला. विष्णूने बडौद्याकडून खेळताना चंडीगड विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं. त्याने नाबाद 103 धावांची खेळी केली.


विष्णूच्या त्या कृतीमुळे सचिनची आठवण


विष्णूच्या या शतकानंतर सर्वांना सचिन तेंडुलकरच्या त्या शतकी खेळीची आठवण झाली. सचिनही वडिलांच्या निधनानंतर संघात पुन्हा परतला होता. सचिनने त्यानंतर काही दिवसांनी खणखणीत शतक लगावलं होतं. 


रविवारी रणजी करंडकातील सामन्याचा शेवटचा दिवस होता. या दरम्यान विष्णूला त्याच्या वडिलांचं निधन झाल्याचं कळवण्यात आलं. विष्णूच्या वडिलांचं उपचारादरम्यान निधन झालं. विष्णूचे वडिल अनेक दिवसांपासून आजारी होते.


"विष्णूने आपली मुलगी गमावली. विष्णू आणि त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. मात्र त्यानंतरही विष्णू परत टीममध्ये परतला. विष्णूच्या या कृतीतून त्याचं क्रिकेटप्रती असलेलं प्रेम आणि  निष्ठेचं दर्शन झालं. तो खरा टीम मॅन आहे", अशी प्रतिक्रिया बडोदा क्रिकेटअसोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली.