ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ४ रननं निसटता पराभव झाला. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत खेळत असताना भारताचा विजय होईल असं वाटत होतं. पण ऋषभ पंतची विकेट गेल्यानंतर मॅच फिरली असं वक्तव्य भारताचा कर्णधार विराट कोहलीनं केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजयासाठी १७४ रनची आवश्यकता असताना भारताला १६९/७ एवढाच स्कोअर करता आला. पाऊस पडल्यामुळे ही मॅच १७ ओव्हरची करण्यात आली होती. १७४ रनचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर रोहित शर्मा ७ रनवर आऊट झाला. पण शिखर धवननं ४२ बॉलमध्ये ७६ रनची खेळी केली. यामध्ये १० फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. पण लोकेश राहुल, विराट कोहली आणि शिखर धवनच्या रुपात भारताला लागोपाठ ३ झटके लागले.


या तीन विकेट गेल्यानंतर दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतनं पुन्हा एकदा भारतीय इनिंगला आकार देण्याचा प्रयत्न केला. दिनेश कार्तिकनं १३ बॉलमध्ये ३० रनची वादळी खेळी केली. कार्तिक आणि पंत भारताला विजय मिळवून देतील अशी अपेक्षा होती पण ऋषभ पंत चुकीचा फटका मारून आऊट झाला. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १२ रनची आवश्यकता होती. पण मार्कस स्टॉयनिसनं पहिले कृणाल पांड्या आणि मग दिनेश कार्तिकची महत्त्वाची विकेट घेऊन भारताचा विजयाचा घास हिरावून घेतला.


या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियानं १७ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून १५८ रन केले. पण डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी १७ ओव्हरमध्ये १७४ रनचं आव्हान मिळालं.


ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलनं २४ बॉलमध्ये सर्वाधिक ४६ रन केले. तर क्रिस लिननं २० बॉलमध्ये ३७ आणि मार्कस स्टॉयनिसनं १९ बॉलमध्ये नाबाद ३३ रन केले. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि खलील अहमदला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. ३ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये भारत १-नं पिछाडीवर आहे.