मुंबई : मुंबई इंडियन्सच्या टीमने चौथ्यांदा आयपीएलचा खिताब जिंकल्याने फॅन्ससाठी कालचा दिवस आनंदाचा होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीमने हा खेळ केला. आयपीएल फायनलच्या रोमांचक मॅचमध्ये मुंबईचा अवघ्या १ रनने विजय झाला असला तरी 'जो जिता वही सिकंदर' उक्ती प्रमाणे मुंबई सर्वोत्तम ठरली. मुंबईने ठेवलेल्या १५० रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने २० ओव्हरमध्ये चेन्नईने १४८/७ एवढा स्कोअर केला. कृणाल पांड्याच्या १८ व्या ओव्हरला चेन्नईने २० रन आणि मलिंगाच्या १६व्या ओव्हरला चेन्नईने २० अशा एकूण ४० रन काढल्या पण तरीही मुंबईला हा सामना जिंकण्यात यश आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या ओव्हरला सपाटून मार खालेल्या मलिंगाला कॅप्टन रोहित शर्माने शेवटच्या ओव्हरसाठी पाचारण केले. त्यानंतर अनेक फॅन्सनी नाराजीचा सुर आळवला. पण आपल्या अनुभवाच्या जोरावर मलिंगाने हा निर्णय खरा करुन दाखवला. मलिंगाच्या ओव्हरला २० रन आल्यानंतरही मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला २०वी ओव्हर दिली. २०व्या ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी ९ रनची गरज होती, तेव्हा मलिंगाने फक्त ७ रन दिल्या. चेन्नईला शेवटच्या बॉलला जिंकण्यासाठी २ रन हवे होते, तेव्हा मलिंगाने शार्दुल ठाकूरला एलबीडब्ल्यू केलं.


मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाकडून अपेक्षेप्रमाणे खेळ झाला नाही. पण शेवटच्या ओव्हरला त्याने भेदक मारा करुन आपल्या टीमला चॅम्पियन बनवले. यावर कॅप्टन रोहित शर्मा याने आपली प्रतिक्रीय दिली. मलिंगाने तेच केले जे चॅम्पियन्स करतात. त्याची तिसरी ओव्हर भलेही वाईट गेली असेल तरी मला त्याच्यावर विश्वास होता की तो संभाळून घेईल. त्यालाही स्वत:वर विश्वास होता. हार्दिक पांड्याला ओव्हर द्यावी असे देखील माझ्या मनात आले होते. पण अशा बॉलरला ओव्हर द्यावी ज्याने आधीही विजयी कामगिरी केली आहे असे ठरवले. मलिंगाने याआधीही आम्हाला अशा मॅच जिंकवून दिल्या आहेत. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणे कठीण नव्हते असे रोहित म्हणाला. 


कॅप्टन म्हणून मी देखील काही गोष्टी शिकत आहे आणि टीमला देखील भरपूर फायदा मिळत आहे. मी प्रत्येक मॅच आणि टुर्नामेंटमधून काही ना काही शिकत असतो. पण याचे श्रेय मी टीमला देतो. मी या टीमचा प्रतिनिधी आहे.टीमचे खेळाडू चांगला कॅप्टन बनवतात. 



मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएलचा खिताब जिंकत इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सही सर्वाधिक आयपीएल खिताब जिंकणारी टीम ठरली आहे. यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंगला मागे टाकले आहे. चेन्नईने आतापर्यंत 3 खिताब जिंकले आहेत.