मुंबई : हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी दणदणीत विजय झाला आहे. मुंबईने ठेवलेल्या १७१ रनचा पाठलाग करताना चेन्नईला १३३/८ एवढ्या स्कोअरपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून केदार जाधवने सर्वाधिक ५८ रनची खेळी केली. १७१ रनचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. स्कोअरबोर्डवर फक्त १ रनच असताना अंबाती रायुडू पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या बेहरेनडॉर्फने रायु़डूला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर चेन्नईला वारंवार धक्के लागतच होते. मुंबईकडून लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर बेहरेनडॉर्फला २ विकेट मिळाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलेल्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली. स्कोअरबोर्डवर फक्त ८ रन असतानाच क्विंटन डी कॉक ४ रनवर आऊट झाला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ४३ बॉलमध्ये सर्वाधिक ५९ रन केले. तर कृणाल पांड्याने ३२ बॉलमध्ये ४२ रन केले.


हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्डने शेवटच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला १७० रनपर्यंत मजल मारता आली. हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्डने ब्राव्होच्या शेवटच्या ओव्हरला २८ रनची बरसात केली. शेवटच्या ३ ओव्हरमध्ये मुंबईने ५१ रन कुटल्या. हार्दिक पांड्याने ८ बॉलमध्ये नाबाद २५ रनची खेळी केली. यामध्ये १ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. तर पोलार्डने ७ बॉलमध्ये नाबाद १७ रन केले.


यंदाच्या आयपीएलमधला मुंबईचा हा दुसरा विजय आहे. तर या मोसमातला चेन्नईचा हा पहिलाच पराभव आहे. याआधीच्या तिन्ही मॅचमध्ये चेन्नईचा विजय झाला होता. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईचे ६ आणि मुंबईचे ४ पॉईंट्स आहेत.


मुंबईची टीम आता शनिवारी हैदराबादविरुद्ध पुढची मॅच खेळणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री ८ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.