चेन्नई : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या प्ले-ऑफच्या टीम आता निश्चित झाल्या आहेत. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद या टीम प्ले-ऑफमध्ये दाखल झाल्या आहेत. यातला क्वालिफायर-१ चा सामना मुंबई आणि चेन्नईमध्ये होणार आहे. ७ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या इतिहासामध्ये चेन्नईविरुद्ध मुंबईचं रेकॉर्ड चांगलं आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये आत्तापर्यंत २६ मॅच झाल्या आहेत. यातल्या १५ मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे, तर ११ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईच्या मैदानात झालेल्या ६ मॅचपैकी ४ मॅचमध्ये मुंबईचा विजय आणि २ मॅचमध्ये पराभव झाला. आयपीएल इतिहासात मुंबई ही एकमेव टीम आहे ज्यांची चेन्नईतली कामगिरी सरस राहिली आहे. आयपीएलच्या प्ले-ऑफचा सामनाही चेन्नईमध्येच होणार आहे, याचा मानसिक फायदा मुंबईला होऊ शकतो.


यंदाच्या मोसमात मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये झालेल्या दोन्ही मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. पहिले मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी विजय झाला होता. तर चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये मुंबईने चेन्नईवर ४६ रननी मात दिली. मुंबईने दिलेल्या १५५ रनचा पाठलाग करताना चेन्नईला १०९ रनच करता आल्या.


पराभूत टीमला आणखी एक संधी


मुंबई आणि चेन्नईपैकी जी टीम विजयी होईल ती थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर पराभव झालेल्या टीमला आणखी एक संधी मिळेल. ८ मे रोजी दिल्ली आणि हैदराबादमध्ये एलिमिनेटर मॅच होईल. विशाखापट्टणममध्ये संध्याकाळी ७.३० वाजता या मॅचला सुरुवात होईल. या मॅचमध्ये ज्या टीमचा पराभव होईल ती टीम बाहेर जाईल. तर शुक्रवार १० मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना होईल. मुंबई आणि चेन्नईच्या मॅचमध्ये ज्या टीमचा पराभव होईल त्या टीमचा सामना दिल्ली-हैदराबाद मॅचमधल्या विजयी टीमशी होईल. क्वालिफायर-२ मध्ये विजय मिळवलेली टीम रविवारी १२ मे रोजी आयपीएलची फायनल खेळेल.