IPL 2023 : आयपीएलमध्ये रविवारी म्हणजे 30 एप्रिलला डबल हेडर (Double Header) सामने खेळवले जाणार आहेत. यात पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि पंजाब किंग्ज (PBKS) दरम्यान रंगणार आहे. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) दरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना आयपीएलमधला ऐतिहासिक सामना असणार आहे. कारण आयपीएलमधला हा हजारावा (1000 Match in IPL) सामना आहे. त्यातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा वाढदिवस (Rohit Sharma Birthday) आहे. या दिवशी रोहितला एक खास गिफ्ट दिलं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत रंगणार सामना
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यानचा हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. या दिवशीच रोहितचा वाढदिवस असल्याने त्याला खास गिफ्ट मिळणार आहे, पण ते मुंबईत नाही तर दुसऱ्या राज्यात दिलं जाणार आहे. हे गिफ्ट त्याला मुंबईपासून 700 किलोमीटर दूर असलेल्या हैदराबादमध्ये दिलं जाणार आहे. 30 एप्रिलला म्हणजे रोहितच्या वाढदिवशी हैदराबादमध्ये रोहितचं 60 फूट उंच कटआऊट लावलं जाणार आहे. या कटआऊटचं उद्घाटन रोहितच्या वाढदिवशी केलं जाणार आहे. या कटआऊटची झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 


हैदरादबाद आणि रोहित शर्माचं आयपीएलमध्ये खास नातं आहे. रोहित शर्माने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघातून केली होती आणि त्याचवर्षी म्हणजे 2009 मध्ये रोहित शर्माने पहिली हॅटट्रीक घेतली होती. त्यामुळे त्याच्या सन्मानार्थ हैदराबादमध्ये हा भव्य कटआऊट उभारला जाणार आहे. 



मुंबई इंडियन्स देणार विजयाचं गिफ्ट?
मुंबई इंडियन्सकडून रोहितला सरप्राईज गिफ्ट दिलं जाईलच पण त्याच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट असेल ते विजयाचं. राजस्थान रॉयल्सचा पराभव करत रोहित शर्माला विजयाचं गिफ्ट देण्याचा मुंबई इंडियन्सचा  प्रयत्न असेल. 


मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी
आयपीएलमध्ये पाचवेळा विजेत्या मुंबई इंडियन्सची सोळाव्या हंगामात आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्यापैकी तब्बल चार सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. अशात मुंबईसाठी प्लेऑफमध्ये जाण्याचं आव्हान कठिण असणार आहे. प्लेऑफचं तिकिट मिळवण्यासाठी मुंबईला पुढचे सातही सामने जिंकावे लागणार आहेत. रोहितलाही या स्पर्धेत खास कामगिरी करता आलेली नाही. सात सामन्यात रोहितने केवळ एकच अर्धशतक केलं आहे. तर सात सामन्यात रोहितला केवळ 181 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या विजयाबरोबरच रोहितच्या कामगिरीवरही क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.