कोहली म्हणतो, हो मला फरक पडतो !
आपल्याला बोलायला हवं !, हो, मला फरक पडतो ! असे हॅशटॅग त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.
नवी दिल्ली : आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेले ट्विट चर्चेचा मुद्दा बनले आहे. या ट्विटमध्ये त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. दिल्ली, आपल्याला बोलायला हवं !, हो, मला फरक पडतो ! असे हॅशटॅग त्याने या व्हिडिओला जोडले आहेत.
व्हिडिओतून आवाहन
दिल्लीमधील प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस अधिकच जटिल बनत चालली आहे. गेल्या काही दिवसांत तर धूरमिश्रित धुक्याची समस्या दिल्लीकरांच्या डोक्याला ताप बनत चालली आहे. यावर आळा बसण्यासाठी कोहलीने आपल्या व्हिडिओतून दिल्लीकरांना आवाहन केले आहे.
सार्वजनिक वाहनांचा वापर करा
सार्वजनिक वाहनांचा वापर जास्तीत जास्त करावा जेणेकरुन प्रदुषणाला आळा बसेल असेल आवाहन त्याने या व्हिडिओत केले आहे.
प्रदूषणाशी दोन हात
तो म्हणतो , दिल्लीत प्रदूषणाची सध्याची स्थिती सर्वज्ञात आहेच. मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रदूषणाबाबत आपण सर्वजण बोलत आहोत, त्यावर चर्चा, वाद घालत आहोत. पण आपण कोणी याच्याशी दोन हात करण्याचा विचार केला आहे का ?
सर्वांची जबाबदारी
प्रदूषणाविरूद्धची मॅच जर आपल्याला जिंकायची असेल तर सर्वांनी एकत्र यावं लागेल. कारण प्रदूषण कमी करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. असा संदेश त्याने या व्हिडिओतून दिला आहे.
सम विषम फॉर्म्युला
या वाढत्या प्रदूषणावर उपाय करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाहनांसाठी ५ दिवस समविषम फॉर्म्युलाही लागू केला. सम-विषम योजना सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत लागू असणार आहे. मात्र यावर हरीत लवादाने शंका उपस्थित केली आहे.