लंडन :  टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंड ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहेत. १ ऑगस्टपासून या सीरिजची पहिली टेस्ट खेळवण्यात येणार आहे. या सीरिजआधी भारताचा बॅट्समन अजिंक्य रहाणेनं माध्यमांशी संवाद साधला. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये कुलदीप यादव शानदार फॉर्ममध्ये होता त्यामुळे टेस्ट सीरिजमध्येही कुलदीपला संधी मिळणार का? कुलदीपला संधी मिळाली तर अश्विन आणि जडेजापैकी कोणाला डच्चू मिळणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रश्नांना अजिंक्य रहाणेनं उत्तरं दिली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलदीप यादव हा टीममधला एक्स फॅक्टर आहे. वनडे आणि टी-२०मध्ये त्यानं चांगली बॉलिंग केली. खेळपट्टी कशी आहे ते आम्हाला उद्या आणि परवा बघावं लागेल. पण अश्विन आणि जडेजाला विसरून चालणार नाही. त्यांनी टीमसाठी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अश्विननं तर बॉलिंगबरोबरच बॅटिंगमध्येही त्याची चुणूक दाखवल्याचं अजिंक्य रहाणे म्हणाला.


इंग्लंडमधल्या वातावरणात बॉलरना मदत मिळते पण याचा अर्थ बॉलरना सोपं होतं असा नाही. इथल्या वातावरणामध्ये बॉलरना संयमानं एकाच ठिकाणी बॉलिंग करावी लागते. तसंच स्वत:च्या कौशल्याला पाठिंबा द्यावा लागतो. दोन्ही बाजूनं विकेट घेण्यापेक्षा एका बॉलरनं दुसऱ्या बॉलरला पाठिंबा दिला तर एका बाजूनं विकेट येऊ शकतात, असं रहाणेला वाटतंय.