मुंबई : मुंबईनं यंदाच्या विजय हजारे स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत मुंबईनं दिल्लीवर ४ गडी राखून मात केली. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकत दिल्लीला फलंदाजीसाठी पाचारण केलं. धवल कुलकर्णी आणि शिवम दुबेच्या गोलंदाजीसमोर दिल्लीचा डाव अवघ्या १७७ धावांवर आटोपला.


१७८ धावांचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ स्वस्तात माघारी परतले. कर्णधार श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादवही चमकदार कामगिरी करु शकले नाही. सिद्धेश लाड आणि आदित्य तरेनं शतकीय भागीदरी रचून मुंबईला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. आदित्य तरेला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.