मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या (T20 World Cup 2021)  सुपर 12 सामन्यात टीम इंडियाचा  (Team India) न्यूझीलंड विरुद्ध निराशाजनक पराभव झाला. किवींनी विराटसेनेवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग अजूनही अवघड झाला. या पराभवामुळे टीम इंडियावर टीकेची झोड उठवली जात आहे. टीम इंडियाने महत्त्वाच्या आणि निर्णायक सामन्यात बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केले. याचाच परिणाम टीम इंडियाला भोगावा लागला. या अनपेक्षित बदलामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांसह क्रिकेट समर्थकांनाही धक्का बसला. या पराभवावरुन पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) निराशा व्यक्त केली. (T20 World Cup 2021 india vs nz pakistan former bowler shoaib akhtar give reaction on team india loss)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अख्तर काय म्हणाला?


न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवावरुन अख्तर निराशा व्यक्त करत टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिला. टीम इंडियाच्या खेळाडूंना इंस्टाग्रामवर क्रिकेट खेळायचंय की मैदानावर  याबाबत विचार करावा. 


"न्यूझीलंडने टॉस जिंकला तर टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरेल, अन् तेच झालं. टीम इंडिया फार वाईट खेळली. कामगिरी फार निराशाजनक राहिली. टीम इंडियाने मॅचवर पकड बनवली आहे, असं एका क्षणासाठीही वाटलं नाही. विराटसेना दबावात वाटत होती. सर्व चित्र पाहून असं वाटत नव्हतं की 2 टीम खेळतायेत. टीम इंडियाने या सामन्यात केलेली कामगिरी पाहून मी फार दुखावलोय", अशी प्रतिक्रिया अख्तरने दिली. अख्तर त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलत होता. 


"मला समजत नाही की टीम इंडिया असं कसं खेळू शकते. तुम्ही टॉस हरलात म्हणजे तुमचं आयुष्य संपलं असं होत नाही. टीम इंडियाने टॉस गमावल्यानंतर शरणागती पत्कारली होती, असं मला वाटतं. टीमने बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केला. खराब फटके मारले. मोहम्मद शमीने उशिरा बॉलिंग केली तर शार्दुल ठाकूरने निराशाजनक कामगिरी केली. हे सर्व चित्र पाहून टीम इंडियाचं अफगाणिस्तान विरुद्ध काय होईल", अशी चिंताही अख्तरनेही व्यक्त केली. 


अख्तरनेही अखेरीस टीम इंडियावर निशाणाही साधला. "तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. तसेच विचार करावा लागेल की तुम्हाला क्रिकेट मैदानात खेळायचंय की इंस्टाग्रामवर", असंही अख्तर म्हणाला.