मुंबई : T20 वर्ल्डकप 2022 मध्ये पुन्हा एकदा महामुकाबला पहायला मिळणार आहे. पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार असून यांच्यातील मुकाबल्याची तारीख समोर आली आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर T-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक फॅन या दिवसाची आतुरतेने वाट पाहतोय.


टीम इंडिया बदला घेणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वेळी UAE मध्ये झालेल्या T-20 वर्ल्डकपमध्ये, पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता. या पराभावाचा फटका टीम इंडियाला बसला. उपांत्य फेरीपूर्वीच भारताला वर्ल्डकपबाहेर पडावं लागलं. त्यामुळे आता यावेळी भारत पुन्हा एकदा पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी तयार आहे.


T-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध 5-1 असा विजयी विक्रम आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने पुन्हा एकदा दोन्ही देशांदरम्यान सामना पाहायला मिळणार आहे. 


2021 च्या T-20 वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानने शेवटच्या वेळी टीम इंडियाचा 10 विकेट्स राखून पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 7 विकेट्स गमावत 151 धावा केल्या. हे लक्ष्य गाठताना पाकिस्तानने 10 विकेट्स राखत भारतावर दणदणीत विजय मिळवला होता.


भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये


T-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन्ही एकाच गटात आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. दरम्यान T-20 वर्ल्डकपचे सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात ठिकाणी होणार आहेत.


T-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. तर उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि अॅडलेड ओव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेत.