Winning T20 World Cup 2024 Is Easy As Compare To IPL: महिन्याभरापासून सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कपची सांगता आज बार्बाडोसच्या मैदानात होणार आहे. आज होत असलेल्या फायनलच्या सामन्यामध्ये भारतीय संघ तब्बल 10 वर्षांपासूनचा आयसीसी स्पर्धांमधील जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशानेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरेल. विशेष म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहिलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे तर भारतासाठी हा तिसरी टी-20 फायलन असणार आहे. यापूर्वी भारताने 2007 साली झालेली पहिली टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2014 साली भारताने अंतिम फेरीत धडक मारलेली. मात्र ही स्पर्धा श्रीलंकेने जिंकली होती. यंदा तब्बल 10 वर्षांनी भारत अंतिम सामन्यात पोहोचला आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची तुलना थेट इंडियन प्रिमिअर लीगबरोबर केली आहे.


या स्पर्धेत फायनलिस्टची कामगिरी कशी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 वर्ल्ड कप फायनल खेळणारे भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ 2024 च्या या स्पर्धेत फायनलला पोहचेपर्यंत अपराजित राहिले आहेत. भारताने पाकिस्तान, अफगाणिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, बांगलादेशच्या संघाला पराभूत केलं आहे. भारताचा एक सामना पावसामुळे खेळवण्यात आला नाही. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेमध्ये श्रीलंका, नेदरलॅण्ड, बांगलादेश, नेपाळ, अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे.


टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सलग 8 सामने जिंकले असून भारताने सलग 7 सामने जिंकले आहेत. पहिल्या सेमी-फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला 9 विकेट्सने पराभूत करत दणक्यात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या सेमी-फायनलमधून भारतीय संघ इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करुन फायनलमध्ये पोहोचला आहे. आता हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध लढणार असल्याने त्यापूर्वी गांगुलीने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत ही स्पर्धा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.


नक्की वाचा >> टीम इंडियाचे चाहते असाल तर हे वाचू नका... उद्या ODI वर्ल्ड कपची पुनरावृत्ती? फायनलचं मैदान भारतासाठी पनवती


...म्हणून आयपीएल जिंकणं अधिक कठीण


इंडियन प्रिमिअर लीग जिंकणं हे काही वेळेस टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यापेक्षा कठीण असू शकतं, असं मत गांगुलीने टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी पीटीआयशी संवाद साधताना म्हटलं आहे. आयपीएल जी टी-20 वर्ल्ड कपपेक्षा जिंकण्यासाठी कठीण स्पर्धा असते यामागील मुख्य कारण म्हणजे आयपीएल फार दिर्घकाळ चालणारी स्पर्धा आहे, असंही गांगुली म्हणाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाचं कौतुक करताना त्याने हे विधान काढलं.


नक्की वाचा >> भारत सेटींग लावून T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये, इंझमामचा गंभीर आरोप; म्हणाला, 'पाकिस्तानला कधीच..'


"रोहितने 5 आयपीएल चषक जिंकले आहेत. ही फार मोठी उपलब्धी आहे. आयपीएल जिंकणं टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्यापेक्षा अधिक कठीण आहे. माझ्या म्हणण्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ घेऊ नका. मी असं म्हणत नाहीये की आयपीएल अंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा उत्तम आहे. पण तुम्हाला आयपीएल जिंकण्यासाठी 16-17 (12-13) सामने जिंकावे लागतात. इथे तुम्हाला 8 ते 9 सामने जिंकून वर्ल्डकप जिंकता येतो. वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये फार जास्त सन्मान आहे. मला अपेक्षा आहे की रोहित हे यंदा करुन दाखवेन," असं गांगुली म्हणाला.