लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पहिली वनडे हरल्यानंतर दुसरी वनडे जिंकत इंग्लंडनं या सीरिजमध्ये जोरदार पुनरागमन केलं. या सीरिजची तिसरी आणि शेवटची मॅच १७ तारखेला खेळवण्यात येणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानात झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि भारतापुढे ३२३ रनचं आव्हान ठेवलं. इंग्लंडच्या जो रुटनं शानदार शतक केलं. तर डेव्हिड विलीनं ३१ बॉलमध्ये नाबाद ५० रन केले. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. उमेश यादव, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १ विकेट मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३२३ रनचा पाठलाग करताना भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं चांगली सुरुवात करून दिली. पण स्कोअरबोर्डवर ४९ रन असताना रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का लागला आणि भारतीय बॅटिंग गडगडायला सुरुवात झाली. सुरेश रैनानं सर्वाधिक ४६ रन केले. इंग्लंडच्या लियाम प्लंकेटनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. डेव्हिड विली आणि आदिल रशीदला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या तर मार्क वूड, मोईन अलीला १-१ विकेट मिळाली. ५० ओव्हरमध्ये २३६ रनवर भारताचा ऑल आऊट झाला.


भारताचं लाजिरवाणं रेकॉर्ड 


८६ रननं झालेल्या या पराभवाबरोबरच या मॅचमध्ये भारतानं लाजिरवाणं रेकॉर्ड केलं आहे. या मॅचच्या ५० ओव्हरमध्ये एकाही भारतीय बॅट्समनला सिक्स मारता आली नाही. २०११ वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर पहिल्यांदाच भारतीय बॅट्समनना ५० ओव्हर पूर्ण झालेल्या मॅचमध्ये एकही सिक्स मारता आलेली नाही.