टोकियो : Tokyo Olympics: भारतीय हॉकी संघाचे फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले असताना आता कांस्यपदकाची आशा अजूनही कायम आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेल्जियमने भारताचा 5-2 असा पराभव करुन अंतिम सामना खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंग केले. भारतीय संघ 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकीचा अंतिम सामना खेळण्याच्या जवळ येत होता, पण बेल्जियमने टीम इंडियाचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.


 कांस्यपदकाची आशा कायम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय पुरुष हॉकी संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहे. त्याला उपांत्य फेरीत विश्वविजेता बेल्जियमकडून 5-2 ने पराभूत व्हावे लागले. टीम इंडियाला अजूनही पदक जिंकण्याची संधी आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ आता कांस्यपदकासाठी खेळणार आहे.



भारताची ही संधी हुकली


जर भारतीय हॉकी संघाने हा सामना जिंकला असता तर त्याने रौप्य पदकाची खात्री केली असती, पण तसे झाले नाही. टीम इंडियाने अखेर 1980 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.


 गोलची हॅट्ट्रिक झाल्याने सामन्याला वळण  


अलेक्झांडर हेंड्रिक्सच्या (19 व्या, 49 व्या, 53 व्या) शानदार हॅटट्रिकच्या मागे, गतविजेत्या बेल्जियमने पुरुष हॉकीच्या उपांत्य सामन्यात भारताचा 5-2 असा पराभव केला. या सामन्यात भारत एका टप्प्यावर 2-1 ने आघाडीवर होता, पण त्यानंतर तो खूपच मागे गेला आणि अखेरीस 1980 नंतरची पहिली अंतिम फेरी हुकली. आता भारताला कांस्यपदकासाठी प्रयत्न करावे लागतील. भारतासाठी हा सामना कोण खेळणार, हे जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यानंतर निश्चित होईल.


हरमनप्रीत आणि मनदीपने आशा वाढवली होती


सामन्याचा पहिला गोल बेल्जियमने केला. लोइक फॅनी लुपर्टने दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. सामना सुरू होईपर्यंत भारत  पाठिमागे होता. भारतीय संघ दबावाखाली होता, पण या दबावातून बाहेर आल्यानंतर हरमनप्रीत सिंहने सातव्या मिनिटाला गोल करून सामन्यात उत्साह आणला. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला. गुण 1-1 होता. यानंतर, कर्णधार मनदीप सिंहने स्वतः आघाडी घेतली आणि नवव्या मिनिटाला सुरेख मैदानाच्या गोलद्वारे भारताने 2-1 अशी आघाडी घेतली.


पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने 2-1ची आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ एक गोल झाला. बेल्जियमने केलेल्या या एकमेव गोलमुळे हाफ टाइमनंतर सामना 2-2 च्या बरोबरीत राहिला. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. दुसरीकडे बेल्जियमने शेवटच्या क्वार्टरमध्ये तीन गोल केले.


 बेल्जियमला एकापाठोपाठ एक अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि त्यांनी संधीचे सोने करत भारतावर आघाडी मिळवली. नंतर ही आघाडी कायम ठेवत बेल्जियमने 5-2 ने सामना जिंकला. बेल्जियमने आपल्या पाच पैकी चार गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. बेल्जियम यंदा पुन्हा एकदा अंतिम सामन्यात खेळणार आहे. रियो ऑलिम्पिकमध्ये बेल्जियमला रौप्यपदक मिळालं होते.