`तुम्ही असं उठून...`, विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारावर संतापला, विमानतळावरच सुनावले खडेबोल
भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला (Virat Kohli) मेलबर्न विमानतळावर (Melbourne Airport) आपल्या मुलांनाही शूट केलं जात असल्याची शंका आली.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ मेलबर्नमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान यावेळी विमानतळावर भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाचा प्रसारमाध्यमांशी वाद झाला. मीडियाकडून आपल्या मुलांना शूट केलं जात असल्याची शंका आल्याने विराट कोहलीने प्रसारमाध्यमांना सुनावलं. विराट कोहली आपल्या कुटुंबाप्रती अती संवेदनशील आहे. यामुळेच जेव्हा विमानतळावर त्याला आपल्या परवानगीशिवाय मुलांना शूट केलं जात आहे समजलं तेव्हा त्याचा संताप झाला.
Channel 7 ने दिलेल्या वृत्तानुसार, कॅमेरा आपल्या मुलांच्या दिशेन असल्याचं दिसल्यानंतर विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराशी शाब्दिक वाद झाला. "वेटिंग कॅमेरा पाहिल्यानंतर विराट कोहली काहीसा संतापला होता. पण त्याचा गैरसमज झाला होता. मीडिया आपल्याला मुलांसह शूट करत असल्याचं त्याला वाटलं," असं चॅनेल 7 रिपोर्टर थियो डोरोपौलोसने सांगितलं.
यानंतर विराट कोहलीने आपली भूमिका स्पष्ट केली. "मला माझ्या मुलांसह प्रायव्हसी हवी आहे. मला विचारल्याशिवाय तुम्ही शूट करु शकत नाही," असं त्याने सांगितल्याचं वृत्तात आहे.
रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, पत्रकार आणि कॅमेरामनने विराट कोहलीला त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शूट केलं जात नसल्याचं समजावून सांगितलं. यानंतर वाद मिटला आणि जाण्यापूर्वी विराट कोहलीने कॅमेरामनसह हस्तांदोलन केलं.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कोहली चांगल्या फॉर्ममध्ये नाही. पर्थमधील दुसऱ्या कसोटीत शतक झळकावल्यानंतरही अद्याप त्याला हवा तसा सूर गवसलेला नाही. या शतकासह कोहलीने 5, 7, 11 आणि 11 इतक्याच धावांची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर सात शतके झळकावणाऱ्या माजी कर्णधारासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे त्याची बाद होण्याची पद्धत आहे. तो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याच्या तंत्रावर प्रश्न निर्माण होत आहे.
बॉक्सिंग डे ठरवू शकतो बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा निकाल
पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताने पर्थमधील मालिकेतील पहिला सामना जिंकला. त्यांचा 295 धावांचा विजय हा त्यांचा परदेशातील कसोटीतील सर्वात मोठा विजय होता. ॲडलेडमधील दिवस-रात्र कसोटीत ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन करत मालिकेत 10 गडी राखून विजय मिळवला. पावसाने गब्बा येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित ठेवला होता. चौशा सामना 26 डिसेंबरपासून सुरू होईल.