मुंबई : वीरेंद्र सेहवाग...भारतीय क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव. गोलंदाजांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे एक नावचं पुरेसं आहे. भारताचा महान क्रिकेटर वीरेंद्र सेहवागचा आज ३९वा बर्थडे आहे. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर सेहवागवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसोटी असो, वा वनडे सेहवाग खेळण्याची शैली नेहमीच धडाकेबाज अशी राहिली. फलंदाजीस मैदानात उतरल्यानंतर तो पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर आक्रमण करायचा. सेहवागने जरी क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती घेतली असली तरी आता कमेंटेटर म्हणून तो जोरदार फटकेबाजी करतोय. 


कमेंट्रीशिवाय सेहवाग सोशल मीडियावर किंग बनलाय. शुभेच्छा देण्याच्या आपल्या अनोख्या शैलीने त्याने सोशल मीडियावर चाहत्यांची मने जिंकलीत. 


सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये दोनवेळा त्रिशतक झळकावले. त्याचे पहिले त्रिशतक हे मुल्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध झाले होते. त्यावेळी वीरुने ३७५ चेंडूत ३०९ धावा फटकावल्या होत्या. या त्रिशतकावेळचा एक किस्सा वीरुने एका कार्यक्रमात सांगितला होता.


वीरु फलंदाजी करत असताना सचिन त्याला वारंवार समजावत होता की उंच शॉट खेळून आऊट नाही व्हायचे आहे. जेव्हा वीरु २९५ वर होता त्यावेळी त्याने सचिनला सांगून टाकले की जर स्पिनर आला तर मी नक्कीच षटकार खेचणार. तेव्हा मी बाद झालो तरी चालेल आणि असेच झाले. पुढच्याच ओव्हरमध्ये स्पिनर आला आणि सेहवागने षटकार खेचत आपले त्रिशतक पूर्ण केले. 


वीरेंद्रने क्रिकेट कारिकर्दीत १०४ कसोटी सामन्यांमध्ये ८५८६ धावा केल्या. यात २३ शतकांचा समावेश आहे. ३१९ ही वीरुची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर २५१ वनडेमध्ये ८२७९ धावा केल्यात. सेहवाग १९ टी-२० सामने खेळलाय. यात त्याने ३९४ धावा केल्या.