मुंबई : ५० ओव्हरच्या क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. आत्तापर्यंत झालेल्या ११ वर्ल्ड कपमध्ये भारताने १९८३ आणि २०११ अशा दोनवेळा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. आता तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी विराट कोहलीची टीम मैदानात उतरेल. भारताकडे रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज बॅट्समन, धोनीसारखा सर्वोत्तम रणनितीकार, जसप्रीत बुमराहसारखा बॉलर आणि आपल्या स्पिनवर विरोधी बॅट्समनना नाचवणारे कुलदीप-चहल आहेत. असं असलं तरी या वर्ल्ड कपमध्ये भारताचा हुकमी एक्का ऑलराऊंडर हार्दिक पांड्या असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८३ आणि २०११ या दोन वर्ल्ड कपमध्ये भारताने विजय मिळवला तेव्हा भारताच्या विजयाचा हिरो बॅट्समन किंवा बॉलर नाही, तर ऑलराऊंडरच होता. १९८३ सालच्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव यांनी ८ मॅचमध्ये ३०३ रन केले. १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव भारताकडून सर्वाधिक रन करणारे बॅट्समन होते. एवढच नाही तर त्यांनी १२ विकेटही घेतल्या. यशस्वी बॉलरच्या यादीत कपिल देव सहाव्या क्रमांकावर होते. कपिल देव यांच्याशिवाय मोहिंदर अमरनाथ यांनी २३७ रन केले आणि ८ विकेट घेतल्या.


२०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने ९ मॅचच्या ८ इनिंगमध्ये ३६२ रन केले आणि १५ विकेट घेतल्या. त्या वर्ल्ड कपमध्ये युवराजपेक्षा जास्त विकेट फक्त ३ बॉलरनी घेतल्या होत्या. तर त्याच्यापेक्षा जास्त रन ७ बॅट्समननी केल्या होत्या.


यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताला हार्दिक पांड्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. कारण हार्दिक पांड्या हा एकमेव खेळाडू आहे, ज्याला टीममध्ये पर्याय नाही. हार्दिक पांड्या सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर आक्रमक बॅटिंग करू शकतो. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने मुंबईला जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावली. हार्दिकने आयपीएलच्या या मोसमात १६ मॅचमध्ये १४ विकेट घेतल्या आणि ४०२ रन केले. बॅटिंगमध्ये हार्दिकचा स्ट्राईक रेट १९१.४२ होता. यावर्षी हार्दिकपेक्षा चांगला स्ट्राईक रेट फक्त आंद्रे रसेल (२०४.८१)चा होता.