अहमदाबाद : गुजरातमधील एका महिलेने एअर टेल कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती, गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनावेळी इंटरनेट सेवा ठप्प झाले, या दोन दिवसात तिने चार्ज केलेले मोबाईल पॅक संपले, पण नेटवर्क बंद असल्याने तिला याचा वापर करता आला नाही, आणि तिचे ४४.५० रूपये वाया गेले.  अंजना ब्रम्हभट या महिलेने एअरटेलकडून ४४.५० रुपये परत मागितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअर टेल कंपनीने पैसे द्यायला नकार दिला,  अंजना ब्रम्हभट यांनी अखेर थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले. या कोर्टाच्या लढाईत अंजना यांचा विजय झाला.


अंजना यांना मानसिक त्रास झाल्यामुळे १०  हजार रुपये नुकसान भरपाई आणि कायदेशीर खर्चासाठी ५ हजार रुपयांचा दावा केला. मात्र इंटरनेट सेवा सार्वजनिक कारणांसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे ही नुकसान भरपाई दिली जाऊ शकत नाही, असं ग्राहक न्यायालयाने स्पष्ट केलं. दरम्यान ४४.५०  रुपयांवर १२ टक्के व्याजासह ५५.१८ रुपये देण्याचा आदेश ग्राहक न्यायालयाने दिला.


अंजना यांनी ५ ऑगस्ट २०१५  रोजी १७८ रुपयांमध्ये २८ दिवसांच्या व्हॅलिडीटीचा 2GB डेटा पॅक घेतला. पाटीदार आंदोलनामुळे शहरातील इंटरनेट सेवा २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०१५ या काळात खंडित करण्यात आली होती. त्यामुळे ८ दिवसांची व्हॅलिडीटी वाढवून द्या किंवा ४४.५०  रुपये रिफंड करा, अशी मागणी अंजना यांनी केली. मात्र कंपनीने याला स्पष्टपणे नकार दिला होता.