नागपूर: देशात 'चलेजाव' चळवळ महात्मा फुलेंनी सुरू केली, असा जावईशोध राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावलाय. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. त्यानंतर हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कायम शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याची सवय लागल्यामुळे हे घडल्याचा खोचक टोमणा विरोधकांनी अजितदादांना लगावला.


लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या विधानाचा समाचार घेत असताना पवार यांनी म्हटले की,  महात्मा फुले यांनी 'चले जाव'ची चळवळ उभी केली. अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि लोकसभा अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन असे विधान करतात. भाजपाकडून वारंवार असे विधान केले जात आहे. अशाप्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांच्या मागील बोलवता धनी कोण, हे शोधून काढायला हवे. मनुवादी प्रवृत्ती या देशाला कदापि पुढे घेऊन जाऊ शकत नाही. ही अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.