सातारा: शरद पवार यांना हवेचा रोख ओळखता येतो. त्यामुळेच साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास त्यांनी नकार दिला, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते गुरुवारी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लक्ष्य केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सध्याची परिस्थिती बिकट आहे. जे लोक साताऱ्याला बालेकिल्ला समजत होते, ते आता लढायची हिंमतही करत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातील पोटनिवडणुकीत उतरवायचा प्रयत्न केला. मात्र, मतदारसंघातील प्रत्यक्ष परिस्थिती पाहून त्यांनी माघार घेतली. यावेळी चव्हाणांनी फासे उलटे फेकत शरद पवार हेच निवडणूक का लढवत नाहीत, असा सवाल विचारत त्यांना रिंगणात उतरण्याचा आग्रह केला. 


मात्र, शरद पवार राजकारणातील कसलेला खेळाडू आहे. ते वारा कोणत्या दिशेला वाहत आहे, हे अचूक ओळखतात. त्यामुळेच शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उतरण्यास नकार दिला, असे मोदींनी सांगितले. 


या सभेत मोदींनी उदयनराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिक्षा दिली. आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीला यापेक्षा मोठा फटका बसेल, असे भाकीत नरेंद्र मोदी यांनी वर्तविले.


तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने शिवाजी महाराजांच्या संस्कारांना अनुसरून काम केले. देशाचे संरक्षण आणि राष्ट्रवादाला प्राधान्य दिले. त्यासाठी सरकारने भारतीय लष्कराची क्षमता वाढवून त्यांना इतर देशांच्या बरोबरीला आणून ठेवले. भूदल, नौदल किंवा वायूदल असो, प्रत्येक ठिकाणी आधुनिक शस्त्रे ही लष्कराच्या ताफ्यात सामील झाल्याचेही मोदींनी सांगितले.