कोलोंबो : Sri Lanka Economics Crisis : आर्थिक संकटानंतर श्रीलंकेत मोठा गोंधळ आणि उद्रेक पाहायला मिळत आहे. नागरिक अधिक आक्रमक झाले आहेत. त्यानंतर आता श्रीलंकेच्या संसदेची आज महत्त्वाची बैठक होत आहे. गोटाबाय राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर हालचाली वाढल्या आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोटाबाया राजपक्षे यांनी अधिकृतपणे राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेच्या संसदेचीआज बैठक होत आहे. सभापती महिंदा यापा अबेवर्देना यांनी या बैठकीबाबत माहिती जाहीर केली आहे. घटनेतील तरतुदींनुसार सात दिवसांच्या आत नव्या राष्ट्रपतींची निवड केली जाईल.


दरम्यान श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि माजी मंत्री बासिल राजपक्षे यांना रोखणारा अंतरिम आदेश जारी केला आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना 28 जुलैपर्यंत देश सोडता येणार नाही. 


श्रीलंकेत का उद्रेक पाहायला मिळाला?


सर्वसामान्य जनता महागाईच्या झळांमध्ये होरपळून निघाली आहे. पेट्रोल डिझेलच्या श्रीलंकेतल्या किंमती इतक्या भडकल्यात की विचारांचा भडका उडेल. येथे रोजचं जगणं महाग झाले. पोटाला दोन वेळा मिळणं मुश्कील झालेय. तर शिक्षण ही तर चैन वाटावी अशी परिस्थिती आहे. कोविडनंतर अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण ठप्प झाले आहे. सरकार सर्वसामान्यांचा आवाज ऐकण्यात सतत अपयशी ठरले आणि शेवटी त्याचा उद्रेक झाला. 


जवळपास 100 दिवस हे आंदोलन झाले. नागरिक रस्त्यावर उतरले आणि सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. पोटाची आग न भरल्याने आगीचा भडका उडाला आणि उद्रेक पाहायला मिळाला. अखेर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडून पळून जावे लागलं. त्यांचा मोठा भाऊ आणि माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे, पळून गेलेले अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे, चमल राजपक्षे आणि बसल राजपक्षे यापैकी कोणीच श्रीलंकन जनतेला नकोत, एवढी परिस्थिती झाली आहे. पंतप्रधान विक्रमसिंघेही जनतेत अत्यंत अप्रिय झालेत.