नवी दिल्ली : काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. काहीना काही कुरापत्या करुन भारताला त्रास देण्याचा प्रयत्न पाकिस्ताकडून होताना दिसतोय. प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होऊनही पुन्हा तसाच प्रयत्न केला जातोय. पाकिस्तानी सैन्य आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा काश्मीर घाटीमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहीती सुत्रांनी 'झी न्यूज'ला दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुप्तचर यंत्रणांना LOC वर पाकिस्तान दहशतवाद्यांचे ८ कॅम्प आणि लॉन्च पॅडची ओळख पटली आहे. इथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असून भारतात घुसखोरीची तयारी सुरु असल्याची माहीती समोर येत आहे. 



बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनेतर्फे केलेल्या एअर स्ट्राईकनंतर एलओसीजवळ दहशतवादी मोठ्या संख्येत पुन्हा दिसले आहेत. पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे तीन मोठे कॅम्प दिसल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. 


बालाकोट, गढ़ी, हबीबुल्लाह, बतरसी, चेरो मंडी, शिवाई नाला, मस्करा, अब्दुल्ला बिन मसूद इथे लॉन्च पॅडची ओळख पटली आहे. तर कोटली येथील गुलपूर, सेसा, बाराली, डूंगी येथे दहशतवादी भागातही लॉन्च पॅडची ओळख पटली आहे. ए३ सेक्टर घाटीमध्ये दहशतवादी कॅम्प आढळले.