...तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल; अशोक चव्हाणांचा राष्ट्रवादीला इशारा

कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

Updated: Jan 30, 2020, 09:21 AM IST
...तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल; अशोक चव्हाणांचा राष्ट्रवादीला इशारा title=

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीत पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बीड येथील सभेत इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटल्याचे वक्तव्य केले होते.  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून या टीकेचा तात्काळ समाचार घेतला. 

अशोक चव्हाण यांनी म्हटले की, देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला. 

इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला होता- जितेंद्र आव्हाड

भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतील कुरबुरी काही थांबायला तयार नाहीत. तीनपैकी एका पक्षाचा नेता काहीबाही विधान करतो मग त्यावर इतर पक्ष नाराज होतात, यानंतर सारवासारव केली जाते, हा महाविकास आघाडीसाठी जणू नित्यक्रमच झाला आहे. 

महाविकासआघाडी हा मल्टिस्टारर नव्हे तर हॉरर सिनेमा- फडणवीस

दरम्यान, काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यावर जितेंद्र आव्हाड यांनीही आपली बाजू स्पष्ट केली. इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय क्रांतिकारी होते. परंतु, आणीबाणीबद्दल मतमतांतरे असू शकतात, हे सत्य मी लपवू इच्छित नाही. इंदिराजी आणि मोदी-शहांची तुलना होऊच शकत नाही, असे आव्हाड यांनी सांगितले.