चीन कंपन्यांबरोबर झालेल्या करारांना आता अडथळा नाही - सुभाष देसाई

'चीन कंपन्यांबरोबर झालेल्या करारांना अडथळा येणार नाही.'

Updated: Jun 24, 2020, 02:31 PM IST
चीन कंपन्यांबरोबर झालेल्या करारांना आता अडथळा नाही - सुभाष देसाई title=
संग्रहित छाया

मुंबई : चीन कंपन्यांचे करार रद्द केलेले नव्हते, ते जैसे थे ठेवले होते, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, चीनबरोबर जे संबंध आहेत ते सुधारत असल्याची माहिती आजच आम्हाला मिळाली. त्यामुळे चीन कंपन्यांबरोबर झालेल्या करारांना अडथळा येणार नाही. चीनच्या कंपन्यांबरोबर झालेल्या करारांबाबत केंद्र सरकारने आम्हाला थांबू नका, असे सांगितले नाही. आता परिस्थिती सुधारत असल्याने काही अडचण येईल असे वाटत नाही, असे देसाई म्हणाले.

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने  १५ जून, २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे देसाई यांनी स्पष्ट केले होते. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आज पुन्हा त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देत या कराराबाबत आम्ही पुढे जात आहोत, असे स्पष्ट केले.

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण ५ हजार ०२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहत होतो, मात्र, केंद्र सरकारकडूनही आम्हीला थांबा असेही सांगितलेले नाही, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले आहे.