निर्भया प्रकरण : महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डीसीपी प्रमोद सिंह यांची प्रतिक्रिया

चारही दोषींना फासावर लटकवलं 

Updated: Mar 20, 2020, 09:00 AM IST
निर्भया प्रकरण :  महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डीसीपी प्रमोद सिंह यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : निर्भयाचे चारही दोषी पवन, अक्षय, मुकेश आणि विनयला ठरलेल्या वेळी आज सकाळी ५.३०वाजता फासावर लटकवण्यात आलं. सात वर्षांनंतर निर्भयाला न्याय मिळाला आहे म्हणून आजचा दिवस 'न्याय दिवस' म्हणून साजरा करावा अशी मागणी सर्वच स्तरावरून होत आहे. निर्भया प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणारे SIT टीमचे प्रमुख प्रमोद सिंह कुशवाहा आणि त्यावेळेचे इन्स्पेक्टर राजेंद्र सिंह यांनी निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यामुळे समाधान व्यक्त केलं आहे. 

प्रमोद सिंह हे SIT च्या तपासा दरम्यान दक्षिण दिल्लीचे ऍडिशनल डीसीपी होते. आता प्रमोद सिंह हे स्पेशल सेलचे डीसीपी आहेत. डीसीपी प्रमोद यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवसांमध्ये केसशी संबंधित असलेल्या सर्व आव्हानांसोबतच कुटुंबाच्या प्रश्नांना सामोरं जावं लागत होतं. फक्त देशचं नाही तर आमच्या कुटुंबाकडूनही या निर्भयाला न्याय कधी मिळणार अशी विचारणा केली जात असे. 

'निर्भया प्रकरणात काही नवीन गोष्टींची मदत घेण्यात आली. तपासामध्ये दातांचे ठसे घेण्यात आले. त्या रात्री निर्भयाच्या शरिरावरील दाताचे ठसे मॅच करण्यासाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीचा तपास झाला. अखेर सात वर्षांनंतर निर्भयाला न्याय मिळाला. याचं समाधान आम्हाला देखील आहे,' अशी भावना प्रमोद सिंह यांनी व्यक्त केल्या आहेत. 

२०१२ साली देशाला हादरवणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पवन, अक्षय, मुकेश, विनय या चारही दोषींना अखेर फासावर लटकवण्यात आलं. याआधीच्या तीन डेथ वॉरंटना आव्हान देऊन तीनदा फाशी टाळण्यात यशस्वी झालेल्या दोषींच्या वकिलांना चौथ्यावेळी मात्र यश आलं नाही.