देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांना का म्हणाले, 'अरे वेड्या काय होतास तू'

साऱ्या हिंसाचारावर महाविकास आघाडींच्या नेत्यांची तोंडं शिवली गेलीत

Updated: Nov 16, 2021, 07:00 PM IST
देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांना का म्हणाले, 'अरे वेड्या काय होतास तू' title=

मुंबई : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याचवेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. 'संजय राऊत यांची अवस्था कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू' अशी झाल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

काही लोक सतत टीव्हीवर दिसतात, नॅरेटीव्ह तयार करतात अशी टीका नवाब मलिक आणि संजय राऊत यांचं नाव न घेता केली. काही कोंबडे दिवसभर दिसतात, त्यांच्यावर कावळा चोच मारतो पण गरूड काहीच म्हणत नाही. गरूड वर वर नेतो आणि कावळा खाली फेकतो, भाजपा गरूड आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांचं वादग्रस्त ट्विट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 8 नोव्हेंबरला ट्विट करुन त्रिपुरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिमांवर अत्याचार सुरु असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये मोर्चे निघाले, महाराष्ट्रात हजारो लोक अचानक एकाचवेळी मोर्चा कसे काढतात, संपूर्ण सरकारच्या मदतीन मोर्चे काढले जातात, मु्ददाम हा भेद करण्याचा प्रयोग केला जातो. हिंदुंची दुकानं जाळली जातात, त्यावेळेस मात्र महाविकास आघाडी नेत्यांची तोंड शिवलेली असतात, त्यात संजय राऊतांची अवस्था कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी झाली आहे”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

हा पॅटर्न समजून घ्या
आझाद मैदान इथल्या घटनेत पोलीस जखमी आणि आता एसआरपीएफ जवान जखमी, नेमके हे करणारे कोण? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केल आहे. पोलीसांना मारहाण करणाऱ्या एकालाही अटक नाही, हा पॅटर्न समजून घ्या, मोदी यांच्या विकासला उत्तर देता येत नाही तिथ अल्पसंख्याक विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.